पुणे, (कल्याणी फडके/शिवानी पांढरे) – डिजिटल आणि नवी माध्यमे आली तरी नाट्यगृहांबाहेरील हाताने रेखाटलेल्या फलकांनाच प्रेक्षकांकडून पहिली पसंती मिळते. विशेषत: हे फलक रेखाटल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावून टाकणाऱ्या असतात. मागील सुमारे 25 वर्षे या क्षेत्रात आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती वेगळीच होती. ऐन “सिझन’मध्ये व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, आता अनलॉकमध्ये नाट्यगृह सुरू झाल्याने समाधान आणि आशा वाटत आहे, अशी भावना फलक रेखाटणाऱ्या बाळकृष्ण कलाल यांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
नाटकाची माहिती किमान शब्दांत आणि आकर्षक शैलीत मांडणारे फलक महत्त्वाचे घटक आहेत. नाट्यगृहाच्या बाहेरील सुबक, सुवाच्च आणि वळणदार अक्षरातील फलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, हे फलक अनेक नाटकांची ओळख ठरले आहेत. लॉकडाऊनमध्ये कोरे दिसणारे हे फलक कित्येक महिन्यांनी पुन्हा जादुई कलेने फुलले आहेत.
फलक लेखनात प्रभुत्व असणारे बालकृष्ण कलाल अडीच तास चालणाऱ्या नाटकाचे वर्णन अवघ्या काही ओळींमध्ये करतात. मागील 25 वर्षे शेकडो नाटकांचे फलक रेखाटणारे कलाकार बाळकृष्ण कलाल यांच्याशी दैनिक प्रभातने नाट्यगृह सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला संवाद साधला. यावेळी कलाल यांनी आपला प्रवास उलगडत नाट्यगृह सुरू होण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
1990 च्या आधीपासूनच फलक लेखनाला सुरुवात केली आहे. माझे अक्षर चांगले असल्याने या क्षेत्राकडे आलो. टिळक स्मारक मंदिरापासून फलक रंगवण्याची सुरुवात झाली. आज शहरातील भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आदी शहरांतील नाट्यगृहांतील फलक रेखाटत आहे. महिन्याला साधारण 150 नाटकांच्या फलकांचे लेखन करत असल्याचे कलाल सांगतात.
बॅनर, डिजिटल बोर्ड आदी माध्यमांसाठी होत आहे. मात्र आजही पारंपरिक जाहिरात फलकांना पसंती आहे. या फलकाला निर्मात्यांची पहिली पसंती असते. या कलेला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. कलाकार, निर्माते आणि प्रेक्षकांकडून भरभरून मिळणारे प्रतिसाद ऐकून चांगले वाटते, असे कलाल यांनी नमूद केले.