मुंबई- हिंदी आणि मराठी कलाविश्वात संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक अशी विविधांगी भूमिका पार पाडणारी प्रख्यात संगीतकार जोडी म्हणजे ‘अजय-अतुल’. या जोडीने अनेक सुपरहिट गाणे कलाविश्वाला दिले आहेत.
दरम्यान, या विविधांगी भूमिका पार पाडल्यानंतर या जोडीतील ‘अतुल गोगावले’ आता लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) एका वृत्तवाहिनीवरील ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार असून अतुल गोगावले या कार्यक्रमाची सूत्रसंचालकाची जबादारी आपल्या खांद्यावर घेणार आहे.
आम्ही या कार्यक्रमातून महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येत असल्याचे अतुल यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावे माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे. असं अतुलने सांगितलं आहे.