राजीव मुळ्ये
खर्चिक निवडणुकीत आम्ही निवडून दिलेल्या नेत्यांनो आणि त्यांच्या नेत्यांनो, तुम्ही जे करत आहात ते योग्यच आहे. “राजकारणाचा विचका झालाय,’ अशी शेलकी शेरेबाजी करणाऱ्या भुक्कड बुद्धिवाद्यांकडे बिलकूल लक्ष देऊ नका. या लोकांचा कुणालाच काही उपयोग नसतो आणि जो उपयोगाचा असतो, तोच या जगात टिकतो, हे रोकडं वास्तव आहे. ते तुम्ही राजकारणात घेऊन आलात, ही तुमची या राज्याच्या राजकारणाला मोठी देणगी आहे. अस्थिरता वगैरे शब्द तुम्हीच वापरता. आम्हाला तर काहीच अस्थिर दिसत नाही. उलट आम्ही एन्जॉय करतोय. कॅरी ऑन… मनोरंजन असंच सुरू राहू दे! फक्त या साऱ्या मनोरंजननाट्यात आमच्या हिताचा विचार कुठंच नाहीये… पण त्याचं दुःख तरी कुणाकडं व्यक्त करायचं?
नाटक-सिनेमाच्या तिकिटावर जीएसटी लागला म्हणून काय झालं? ज्यांना थेटरात जाणं परवडत नाही, त्यांच्यासाठी वृत्तवाहिन्यांवरचं मनोरंजन महिनाभर निःशुल्क आणि घरपोच उपलब्ध करून दिलंत, धन्यवाद! यापुढेही अशीच साथ द्याल, याची खात्री आहे. कोण म्हणतं, नाट्यमयता केवळ नाटकात असते? कोण म्हणतं, थरार केवळ चित्रपटात असतो? कोण म्हणतं, ट्विस्ट केवळ टीव्ही मालिकांमध्ये असतो? कोण म्हणतं, आम्हाला मनोरंजनापलीकडे काही गरजा आहेत? ब्रेकिंग न्यूज, सर्वांत मोठी बातमी, धक्कातंत्र, भूकंप, खळबळ, धोबीपछाड इत्यादी वगैरे शब्दांनी तहानभूक हरपली आमची. घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यानं वाहून गेलेला संसार, अवकाळी पावसानं धुऊन नेलेलं शिवार, डोक्यावर चढलेला कर्जाचा बोजा, पोराबाळांची नोकरी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी चाललेली धावाधाव, बॅंकेबरोबर बुडालेली ठेव… कशा-कशाचा मागमूस राहिला नाही. कुणाची गाडी कुणाच्या बंगल्याकडे निघालीय आणि कुठल्या हॉटेलात काय खलबतं चाललीत, याची (पत्रकारांनाही नसलेली) माहिती ऐकून आम्ही मजेत दिवस काढले.
या सर्व घटना-घडामोडींवर शेवटी जो कळस चढवला गेला, तो तर अत्यंत मनोरंजक, धक्कादायक, अनपेक्षित, अविश्वसनीय वगैरे वगैरे… अगदी सस्पेन्स चित्रपटाला लाजवेल असा होता. आम्ही खूप एन्जॉय केला; पण खरं सांगू? आमची करमणूक थांबणार तर नाही ना, अशी भीतीही वाटून गेली. माझी शपथ आहे सर्व नेतेमंडळींना आणि वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांना… आमच्या करमणुकीत अजिबात खंड पडता कामा नये. थोड्याच वेळात आमची भीती निराधार ठरली. सकाळचा रंजक अंक संपतो ना संपतो, तोच दुपारी दुसरा अंक सुरू झाला. सकाळचा क्लायमॅक्स हा ऍन्टी क्लायमॅक्स होता, हे दुपार होता होता स्पष्ट झालं, हे खूप बरं झालं. आता खरी मजा येणार! टीव्ही मालिकांपेक्षा दिलखेचक ट्विस्ट येताहेत कथेत. म्हणजे आणखी काही दिवस तरी आम्हा सर्वांना अन्य कोणताही विचार करण्याची गरज नाही.
तर ते असो! गेले अनेक दिवस मी “जनमताचा आदर’ हा शब्द वारंवार ऐकतोय; किंबहुना “अनादर’ हाच शब्द अधिक वेळा उच्चारला गेलाय. जनमताचा अनादर म्हणजे काय, हे मात्र कुणीच सांगत नाही. खरं तर प्रत्येक मतदारसंघानं आपापला प्रतिनिधी निवडून दिलाय. आता, युती म्हणून कोण-कोण लढलं आणि आघाडी म्हणून कोण-कोण लढलं, त्यांनी पुढचं ठरवायचं होतं! ज्यांच्याकडे आम्ही मतदारांनी जबाबदारी हस्तांतरित केली, त्यांनीच ती पूर्ण करणं अपेक्षित होतं. परंतु त्याहून अधिक गरजेची होती आमची करमणूक. पक्ष आणि त्यांचे नेते अशी काही मेख मारून ठेवतात, की आमची ही गरज पूर्ण होतेच होते. हेच पाहा ना, जे युती म्हणून लढले आणि जे आघाडी म्हणून लढले, त्यांची निवडणूकपूर्व मैत्री असल्यामुळं युतीचा किंवा आघाडीचा म्हणून विधिमंडळ नेता ठरणं अपेक्षित होतं. पण प्रत्येक पक्षानं आपापला विधिमंडळ नेता निवडला. मग प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे बोलावणं राज्यपालांना भागच पडलं. तिथूनच हातात हात आणि पायात पाय हा रोमहर्षक खेळ सुरू झाला. रिऍलिटी शो विस्मृतीत जावेत असा हा “रिअल शो’ आम्हा मतदारांसाठी “पैसावसूल’ ठरला.
निवडणुकीचे निकाल लागले, तेव्हापासून नॉनस्टॉप मनोरंजन सुरू आहे. खरं तर आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरले तेव्हापासूनच! काय एकेकाचं शक्तिप्रदर्शन आणि काय तो खर्च! ढोलताशे… गर्दी, वाह!! निवडून आल्यावर तर एकेकानं कमालच केली. काही विजयी उमेदवारांनी चक्क जेसीबीनं गुलाल उधळला. किती कल्पकता असते ना कार्यकर्त्यांमध्ये! मध्यंतरी सोशल मीडियावर “जेसीबी की खुदाई’ नावाचा हॅशटॅग बराच गाजला होता. भारतात जेसीबीचं काम सुरू असेल, तरी असंख्य रिकामटेकडी माणसं ते पाहात बसतात, या विनोदापासून (?) तो सुरू झाला. अशा माणसांवर जेसीबीनं गुलालाची उधळण होणं, हाच “जनमताचा आदर’ होय. उमेदवार निवडून येणं हा मतदारांचा विजय आहे आणि उमेदवाराच्या खर्चानं तो मतदारांनी साजरा करायलाच हवा. या जेसीबीमुळं सात वर्षांपूर्वीची बैलगाडी आम्ही विसरून गेलो. झालं-गेलं विसरून जायला तंत्रज्ञान किती मदत करतं ना! काल सकाळी मात्र ती बैलगाडी टक्कर आठवली.
एका प्रचंड मोठ्या कथित घोटाळ्याचे बैलगाडीभरून पुरावे मिरवणुकीनं सादर झाले होते. पुरावे ज्यांच्याविरुद्ध होते, ते आज सकाळी पुरावे सादर करणाऱ्यांबरोबर शपथ घेताना दिसले. मग प्रश्न पडला “जनमताचा आदर’ ही खरंच काय भानगड आहे? ज्यांच्याविरुद्ध लढलो त्यांच्याबरोबर हातमिळवणी करणं हा “अनादर’ तर मग “आदर’ कशाला म्हणायचं? तर तेही असो! महाराष्ट्र हे एक प्रागतिक राज्य मानलं जातं. आम्ही त्या राज्याचे नागरिक आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची प्रगती वेगानं झालेली आहे. मग ती औद्योगिक असो, शेतीविषयक असो किंवा आर्थिक क्षेत्रातील असो. वैचारिक क्षेत्रात तर महाराष्ट्रानं देशाला मार्गदर्शन केलंय.
आता शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या आमच्याच राज्यात झाल्यात. उद्योगांची जगभरात जी वाटचाल सुरू आहे, त्यातही आमचं राज्यच आघाडीवर आहे. वैचारिक क्षेत्रातसुद्धा आपलं राज्य आघाडीवर राहायलाच हवं. आपले सर्वपक्षीय नेते त्याची मनापासून काळजी घेत आहेत. विचारात सातत्य आणि सलगता असणं हा ठराविक मर्यादेपर्यंत गुण असला, तरी आपलं अनुभवविश्व ज्याप्रमाणे बदलत जातं, त्याप्रमाणं विचारांत फरक पडत जातो. यालाच “वैचारिक प्रगती’ मानायला हवं. काल जे वाटत होतं, ते आज वाटत नाही, हेच वैचारिक प्रगतीचं लक्षण आहे. आपल्याला राजकीय भूकंप किंवा धक्कातंत्र असे शब्द आठवत असले, तरी वैचारिक प्रगल्भता लाभलेल्या आपल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर एकही रेषा उमटलेली नाही.
तेव्हा, खर्चिक निवडणुकीत आम्ही निवडून दिलेल्या नेत्यांनो आणि त्यांच्या नेत्यांनो, तुम्ही जे करत आहात ते योग्यच आहे. “राजकारणाचा विचका झालाय,’ अशी शेलकी शेरेबाजी करणाऱ्या भुक्कड बुद्धिवाद्यांकडे बिलकूल लक्ष देऊ नका. या लोकांचा कुणालाच काही उपयोग नसतो आणि जो उपयोगाचा असतो, तोच या जगात टिकतो, हे रोकडं वास्तव आहे. ते तुम्ही राजकारणात घेऊन आलात, ही तुमची या राज्याच्या राजकारणाला मोठी देणगी आहे. आज संपूर्ण देशाचं लक्ष तुम्ही मंडळींनी महाराष्ट्राकडे वेधून घेतलंय. देशाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचीच चर्चा सुरू आहे. ही वाटचाल अशीच राहायला हवी. अस्थिरता वगैरे शब्द तुम्हीच वापरता. आम्हाला तर काहीच अस्थिर दिसत नाही. उलट आम्ही एन्जॉय करतोय. कॅरी ऑन… मनोरंजन असंच सुरू राहू दे! फक्त या साऱ्या मनोरंजननाट्यात आमच्या हिताचा विचार कुठंच नाहीये… पण त्याचं दुःख तरी कुणाकडं व्यक्त करायचं?