लखनौ -उत्तरप्रदेशात राजकीय प्रभाव असणाऱ्या काही नेत्यांचे मागील दोन वर्षांत निधन झाले. आता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे राजकीय वारसदार कशी कामगिरी करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) संस्थापक अजित सिंह, भाजप नेते लालजी टंडन, समाजवादी पक्षाचे (सप) नेते बेनीप्रसाद वर्मा या नेत्यांचे मागील काळात निधन झाले. आता त्यांच्या मार्गदर्शनाविनाच त्यांच्या राजकीय वारसदारांना पुढील वाटचाल करावी लागणार आहे. कल्याण यांचे पुत्र राजवीर सिंह हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत.
आता भाजपने कल्याण यांचे नातू संदीप यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. रालोदची सुत्रे आता अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्याकडे आली आहेत. चौधरी यांना वडिलांविना प्रथमच निवडणूक रणसंग्रामात सहभागी व्हावे लागत आहे. रालोदने सपशी आघाडी केली आहे.
टंडन यांचे पुत्र आशुतोष उत्तरप्रदेशचे मंत्री आहेत. त्यांना यावेळी वडिलांच्या अनुपस्थितीत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सपचे नेते वर्मा यांचे पुत्र राकेश राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना सपची उमेदवारी निश्चित मानले जाते.
वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव यावेळी निवडणुकीत फार सक्रिय राहण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सपचा सर्व डोलारा यावेळी मुलायमपुत्र अखिलेश यांनाच सांभाळावा लागणार आहे.