पुणे – विदर्भात टोळधाडीने आतापर्यंत 90 हेक्टरवरील पिकांचा फडशा पाडला आहे. या टोळधाडीला हुसकावून लावण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तर, टोळधाडीच्या प्रवासाच्या मार्गावर कृषी विभागासह राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
विदर्भातील अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांनंतर टोळधाडीने भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. कृषी विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे कीड नियंत्रण सुरू केले आहे. परंतु, त्यास अपेक्षित यश मिळाले नाही.
दरम्यान, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी कीटकविज्ञान विभागाने या संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यात मादी टोळ ओलसर जमिनीत अंडी देते. अंड्यातून बाहेर आल्यानंतर लहान टोळ लगेच उडत नाही. यामुळे अंडे नष्ट करणे हा उपाय असू शकतो, असे विद्यापीठाने सूचविले.