माणूस स्वतःच पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. पंचमहाभूते म्हणजेच निसर्ग. जर आपण स्वतःच निसर्गापासून बनलेले असू, तर आपली अर्थव्यवस्था त्याच निसर्गाच्या दोहनावर आधारित किती दिवस राहू शकेल? आपल्या मोजमापाच्या परिमाणांमधील त्रुटी समजून घेऊन नवी चपखल परिमाणे विकसित करण्याची हीच वेळ आहे. ही परिमाणेच आपल्याला सत्य आणि असत्य अर्थव्यवस्थेमधील फरक दाखवून देऊ शकतील.
कोणतीही प्रक्रिया, मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, ती तीन टप्प्यांमध्ये होत असते. पहिल्या टप्प्यात ज्या व्यवस्थेत ती प्रक्रिया घडत आहे, त्या प्रक्रियेसाठी वातावरणातून ऊर्जा घेतली जाते. दुसऱ्या टप्प्यात व्यवस्थेत जी प्रक्रिया घडली, त्यापासून एका सकारात्मक
ऊर्जेचे उत्पादन होते. ही सकारात्मक ऊर्जा पहिल्या टप्प्यात निसर्गाकडून घेतलेल्या ऊर्जेपेक्षा कमी असते. प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात शिल्लक राहिलेली ऊर्जा व्यवस्थेकडून नकारात्मक
ऊर्जेच्या स्वरूपात आपल्या वातावरणात सोडली जाते. भौतिक, औष्णिक, जैविक किंवा आर्थिक अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थांमध्ये हा नियम लागू होतो.
अशा पार्श्वभूमीवर, आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या मापनपद्धतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ऊर्जेचे योग्य प्रकारे आकलन करणे आवश्यक आहे. जीडीपी या संकल्पनेचा वापर अर्थव्यवस्थेच्या मूल्यमापनासाठी गेल्या ऐंशी वर्षांपासून केला जात आहे. हा निकष दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ऊर्जेचे आकलन कसे करतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
उदाहरणार्थ, एखादा शेतकरी देशी बियाणे, जे त्याच्या मागील वर्षाच्या उत्पादनातून शिल्लक राहिलेले आहे, त्याची पेरणी करतो. आपल्या घरातील गुरांच्या मलमूत्राचा वापर करतो आणि पीक घेतो. नंतर स्वतःच पिकाची कापणी करतो आणि उत्पादित अन्नधान्याचा वापर स्वतःच्याच घरात भोजनासाठी करतो. या संपूर्ण प्रक्रियेत इतर सर्व प्रक्रियांप्रमाणेच दुसरा आणि तिसरा टप्पा येतो; परंतु या संपूर्ण प्रक्रियेमुळे जीडीपीमध्ये काहीच फरक पडत नाही. म्हणजेच, जीडीपी हा निकष इथे चुकीचा ठरतो आहे.
आणखी एक उदाहरण घेऊया. समजा, एक माणूस हॉटेलमध्ये रसायनयुक्त अन्न सेवन करतो आणि आजारी पडतो. यामध्येही दुसरा आणि तिसरा टप्पा येतो; परंतु दुसऱ्या टप्प्यात त्याने हॉटेलचे बिल दिले, त्याचीच केवळ नोंद होते. तिसऱ्या टप्प्यात तो आजारी पडला, याची नोंद कुठेच होत नाही. अर्थातच, याही उदाहरणात जीडीपी ही मापनपद्धती वास्तवाचे आकलन करण्यात पुन्हा चुकीची ठरली.
कोणत्याही प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात जी नकारात्मक ऊर्जा व्यवस्थेकडून वातावरणात जात आहे, तिचे केवळ योग्य प्रकारे मापन करणेच आवश्यक आहे असे नव्हे तर ती नकारात्मक ऊर्जा पुन्हा सकारात्मक रूप कसे धारण करेल, याचीही काळजी घेतली पाहिजे. निसर्गातील सर्व प्रक्रिया चक्राकार असतात.
उदाहरणार्थ, जलचक्र, प्रकाश संश्लेषण, नायट्रोजन चक्र, पोषक घटकांचे चक्र इत्यादी. या सर्व प्रक्रियांची गती एवढी मर्यादित असते, जेणेकरून त्यांच्या व्यवस्थेतून तिसऱ्या टप्प्यात जी नकारात्मक ऊर्जा किंवा एन्ट्रोपी उत्पन्न होते, ती व्यवस्थापन करता येण्याजोगी असावी आणि चक्राचा शेवट जेव्हा होईल, ही एन्ट्रोपी पुन्हा सकारात्मक ऊर्जेत उपलब्ध व्हावी. मानवनिर्मित प्रक्रियांची गतीही जितकी नैसर्गिक प्रक्रियांच्या गतीशी मिळतीजुळती असेल, तितकीच वातावरणातील नकारात्मक ऊर्जा व्यवस्थापन करता येण्याजोगी असेल. मानवनिर्मित प्रक्रियांची गती निश्चित करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचे योग्य आकलन करणे सर्वाधिक आवश्यक आहे.
आपल्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करणारा जीडीपी हा मापदंड या नकारात्मक ऊर्जेचे योग्य मोजमाप करू शकत नाही, हे वरील उदाहरणांमधून आपण पाहिलेच आहे. याचे एक महत्त्वाचे कारण असेही आहे की, आजकाल मानवनिर्मित प्रक्रिया इतक्या गतिमान झाल्या आहेत, की त्या मुळात चक्राकार स्वरूपाच्या राहिलेल्या नाहीत. म्हणजेच, तिसऱ्या टप्प्यात व्यवस्थेकडून निसर्गात जाणारी नकारात्मक ऊर्जा केवळ मोठ्या प्रमाणात आहे असे नव्हे तर तिचे रूपांतर पुन्हा सकारात्मक ऊर्जेत होण्यासाठी पुरेसा वेळही मिळेनासा झाला आहे.
आज आपण सर्वजण अनुभवतो आहोत की, मानवनिर्मित प्रक्रियांचा वेग इतका तीव्र आहे आणि त्या रेखीय गतीने घडत आहेत, त्याचा परिणाम म्हणून या प्रक्रियांमधून वातावरणात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा प्रचंड वाढली असून, तिचे व्यवस्थापन करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. त्याचे बहुआयामी दुष्परिणाम आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत.
या पार्श्वभूमीवर, सुपीक जमीनसुद्धा पूर्वी मधून-मधून पडीक का ठेवली जात असे, ही गोष्ट आपण समजून घेऊ शकतो. एखाद्या दिवशी उपवास करण्यामागे आणि व्रतवैकल्यांमागेही असाच हेतू असावा. आज आपण त्याला “इंटरमिटेन्ट फास्टिंग’ असे म्हणतो. आपल्या मोजमापाच्या पद्धतींमध्ये या ज्या त्रुटी आहेत, त्यामुळे केवळ पर्यावरणावरच अतिरिक्त भार पडतो आहे, असे नव्हे तर माणसालाही आजाराच्या काळात पुरेसा आराम मिळणे अवघड झाले आहे.
मोजमापाच्या पद्धतींमध्ये एवढी मोठी त्रुटी असल्यामुळे कदाचित सिग्मोइडल कर्व्ह किंवा एस-कर्व्ह या संकल्पनेवर आधारित असलेले आधुनिक अर्थशास्त्र आणि आर्थिक जगतातील लोक या कर्व्हचा इन्फ्लेक्शन पॉइंट म्हणजेच वळणबिंदू जवळ आल्याचे पाहू शकत नसावेत. कदाचित म्हणूनच निसर्गाला स्वतःच तो बिंदू आणणे गरजेचे वाटू लागले असावे. आपण जेव्हापासून जीडीपी हे मोजमापाचे परिमाण स्वीकारले तेव्हापासून या बिंदूकडे जाण्याची गती अत्यंत तीव्र झाली आहे, असे आपल्याला दिसून येईल.
करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने लोकांना सोशल डिस्टन्सिंग राखण्यास भाग पाडले आहे.
शहरांमधील लोकसंख्येची घनता पाहिल्यास तिथे सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे अशक्य आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपल्या देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईची जीवनवाहिनी अर्थात लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगची कल्पना तरी आपण करू शकतो का? या कारणामुळे किमान निकटच्या भविष्यकाळात तरी कदाचित लोक आपापल्या गावातच राहणे पसंत करतील. जागतिकीकरण हा कदाचित एखाद्या लंबकाच्या हालचालीचा उत्कर्षबिंदू होता. लांबलचक पुरवठा साखळ्या ही या जागतिकीकरणाचीच देणगी असून, त्यामुळे आपल्या भोजनातील पौष्टिकता तर संपली आहेच; शिवाय या साखळ्या निसर्गाचेही अपरिमित नुकसान करीत आहेत. शहरात लोकसंख्येचे घनत्व खूपच अधिक असते तेथील लोकांचे जीवन निसर्गापासून अलगच झालेले असते. त्यामुळेच तिथे शारीरिक आणि मानसिक आजार वाढू लागतात.
– ऋचा रंजन