प्रा. किशोर सस्ते
उंच प्रदेशात कमी ऑक्सिजन संपृक्तता असून देखील तेवढे सहन करणाऱ्या सशक्त अशा मानवाची निर्मिती हे निसर्गाचे काम आहे, तर आपण केलेल्या वृक्षतोड आणि प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साइड वाढलेल्या प्रदेशात ऑक्सिजनसाठी वृक्षारोपनाने सशक्त निसर्ग आणि पर्यावरण आपणच निर्माण करावे.
मानवास अन्न आणि पाण्याशिवाय खूप महत्त्वाचा आणि क्षणोक्षणी गरज असलेला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. हवेच्या दाबानुसार हवेमधले समुद्र सपाटीवर ऑक्सिजनचे प्रमाण जास्त म्हणजे ऑक्सिजन संपृक्तता जास्त तर उंच प्रदेशात कमी असते. 1000 मीटर उंचीवर 88 टक्के, 2500 मीटरवर 73 टक्के, 4500 वर 53, 5500 वर 50 आणि 8000 मीटर 33 टक्के अनुक्रमे ऑक्सिजन संपृक्तता असते.
आशिया खंडातील तिबेट, चीन, हिमालय, अमेरिका खंडातील अँडीज, पेरू, बोलिवीया आणि आफ्रिका खंडातील इथोपिया ही काही कमी ऑक्सिजन संपृक्तता असणारी ठिकाणे आहेत. जगातील 2 टक्के म्हणजेच 140 दशलक्ष लोक अशा प्रदेशात राहतात. येथील माणसं 2500 मीटरपेक्षा जास्त उंच अशा प्रदेशात राहतात. गुरखा, शेरपा, हांजू आणि ओरोमो इत्यादी लोक येथे आढळतात.
दरवर्षी लाखो पर्यटक, गिर्यारोहक, खेळाडू, सैन्य, खगोलशास्त्रज्ञ असे लोक भेट देत असतात, त्यांच्यामध्ये हायपॉक्झियामुळे तीव्र पर्वतीय आजारांमध्ये म्हणजेच क्रोनिक माउंटेन सिकनेसमध्ये डोकेदुखी आणि उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. अशा लोकांना काही तास ऑक्सिजनच्या खोलीमध्ये राहून वातावरणाला अनुरूप व्हावे लागते, परंतु येथे राहणारी माणसं हे कमी हवेच्या दाबामुळे कमी मिळणारं ऑक्सिजनचं प्रमाण सहन करतात.
कमी उंचीच्या भागात राहणाऱ्या माणसांच्या तुलनेत यांच्यामध्ये वातावरणानुसार जनुकीय आणि शारीरिक विशेषतः श्वसनात आणि रक्ताभिसरणात बदल झालेले असतात त्यामुळे कमी ऑक्सिजन संपृक्तता असणाऱ्या प्रदेशात देखील ते टिकाव धरू शकतात; म्हणूनच कोणत्याही ऑक्सिजनच्या नळकांड्या शिवाय फु डोरजी हा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला शेर्पा ठरला. याबरोबरच इटलीचा रेइंहोल्ड मेसनेर हा अंटार्टिका आणि ग्रीन लॅंड बरोबरच जगातील एव्हरेस्ट शिखरावर पोहचणारा जगातील पहिला माणूस होता.
या लोकांमध्ये एक विशिष्ट जनुक असतो त्यास इपीएएस1 असे नाव आहे, 48 हजार वर्षांपूर्वी उत्तर सायबेरिया मधल्या डेनिसोवा मानसाच्या गुहेत सापडलेल्या मानवाच्या हाडातल्या जीवाश्मामधल्या डीएनएमध्ये आढळला आहे, तो जास्त ऑक्सिजन असणाऱ्या प्रदेशामधल्या मानवात सापडत नाही. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. तिबेट, इथोपिया आणि अन्डिएन्स यांची तुलना जर केली तर प्रत्येक लोकांमध्ये कमी ऑक्सिजन सहन करण्याचे तत्त्व वेगवेगळे आहे,
अन्डिएन्स लोकांच्या तुलनेत तिबेटीयन लोकांचा एक मिनटाला श्वास घेण्याचा दर जास्त असतो. तसेच तिबेटमधील लोकांची फुफ्फुस घेतलेल्या हवेतून मोठ्या प्रमाणात नायट्रिक ऑक्साइडचे संश्लेषण करतात आणि यामुळे रक्तवाहिन्यांचा आतमधला परिघ वाढवतात आणि कमी ऑक्सिजन संपृक्ततेची कमतरता भरून काढतात. अन्डिएन्स लोकांमधल्या प्रत्येक रक्त पेशीमध्ये जास्त ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता असते,
त्यांचा आणि समुद्रसपाटीवर राहणाऱ्या लोकांच्या श्वसनाचा दर सारखाच असतो परंतु त्यांची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असते. इथोपियामधल्या लोकांमध्ये श्वास घेण्याचा दर जास्त नसतो, ना हिमोग्लोबिन जास्त असते ना त्यांची फुफ्फुस नायट्रिक ऑक्साइडचे संश्लेषण करतात, परंतु तरी ते देखील कमी ऑक्सिजनचे प्रमाण सहजरित्या सहन करतात यावर अजून संशोधन चालू आहे.
हजारो वर्षांपासून कमी ऑक्सिजनच्या उंच प्रदेशात राहून तेथील भौगोलिक परिस्थितीशी मिळतेजुळते घेतले असले तरीदेखील, गर्भवतीमध्ये हायपॉक्झिया म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता आढळते. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने 59 देशांतील 9 लाख 50 हजार मुलांमधील केलेल्या संशोधनानुसार उंच प्रदेशातील गर्भवती महिलांना गर्भ वाढीसाठी कमी पडणारा ऑक्सिजन हा मुलांच्या अपुऱ्या वाढीस कारणीभूत ठरतो. परिणामी मुलांची वाढ खुंटते.
सध्याच्या करोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळाली आहे, उंच प्रदेशात केवळ भौगोलिक परिस्थितीमुळे तेथील ऑक्सिजनच संपृक्ततेचं प्रमाण कमी आहे परंतु मानवाने केलेल्या वृक्षतोडीमुळे आणि प्रदुषणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. हवेतील ऑक्सिजनचा आणि कृत्रिम तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा एकमेकाशी काही संबंध नाही.
सध्या सोशल मीडियावरून नासाचं नाव सांगून जास्त ऑक्सिजनसाठी एक तरी झाड लावा, असे म्हणून झाडांची जंत्रीच बातम्यांमधून प्रसिद्ध होऊन ऑक्सिजन पार्क ही संकल्पना उदयास येत आहे. यात आंतरराष्ट्रीय व्यापारीकरणाचा भाग आहे, असे वाटतं. कारण या मधल्या सगळ्या वनस्पती शोभिवंत, परदेशी आणि कुंड्यांमध्ये येणाऱ्या इनडोअर आहेत. वनस्पती कुठलीही असो स्वदेशी की परदेशी, कोणतीही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देत नाही.
कृत्रीम ऑक्सिजन हा रुग्णालयात तातडीच्या सेवेसाठी अत्यावश्यक आहे, तो आपल्यासाठी गरजेचा आहेच आणि त्याची निर्मिती झालीच पाहिजे याबाबत तिळमात्र शंका नाही, पण आपण निसर्गाची हानी केली म्हणून आपल्याला करोना काळात कृत्रिम ऑक्सिजन कमी किंवा महाग पडला हे म्हणणं चुकीचं आहे.
काहींच्या मते वातावरणातील ऑक्सिजनचे 21 टक्के प्रमाण हे स्थिर आहे आणि वृक्षतोडीमुळे त्यामध्ये कधीही बदल होत नाही; येथे वृक्षतोडीचे समर्थन नाही; पण आपण एक हाताने एक जंगल जरी निर्माण केले आणि आपली फुप्फुसे निकामी होऊन आपण व्हेंटिलेटरवर जरी गेलो तरी लागणारा ऑक्सिजन हा कारखान्याने तयार केलेला कृत्रिमच असणार आहे.
झाडे वातावरणातला कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन सोडतात; झाडे तोडली तर हवेत कार्बन डायऑक्साइड प्रमाण वाढेल आणि ग्लोबल वॉर्मिंग होईल याबद्दल नव्याने सांगायला नको. हवेतला कार्बनडाय ऑक्साइड हे झाडे शोषून घेतात आणि आपली पाने, मुळे आणि खोडात साठवणूक करून ठेवतात आणि नंतर ते वाळले, कुजले किंवा जळले की वातावरणात परत सोडतात. जंगलतोडीमुळे त्याचे प्रमाण वाढत आहे कारण वाढता कार्बन डायऑक्साइड साठवायला झाडे कमी पडत आहेत.