करोना विषाणूच्या प्रसाराने एकीकडे युरोप आणि अमेरिकेसारख्या बड्या अर्थव्यवस्थांना हतबल करून सोडले आहे, तिथे पाकिस्तानसारख्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे काय? पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर विषाणू प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव मार्ग असताना, त्यांनी त्या मार्गाला नाकारले आहे. संचारबंदीचा मार्ग आमच्यासारख्या गरीब देशाला परवडणारा नाही, अशी भूमिका इम्रान खान यांनी घेतली. परंतु त्याला पर्याय मानली गेलेली टाळेबंदीही संपूर्ण देशभर एकसमान लागू झालेली नाही.
धार्मिक कट्टरपंथीयांची भूमिका पाकिस्तानात आजही मशिदींमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यांना थांबवण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही.पाकिस्तानातील मंदिरे, चर्च, गुरुद्वारा संबंधितांनी स्वतःहून बंद केली आहेत. पाकिस्तानात करोनाचा प्रसार रोखण्यात त्या देशातील धार्मिक कट्टरपंथी पुन्हा एकदा समस्या म्हणूनच उभे आहे. पाकिस्तानातील बहुसंख्य इस्लामी धर्ममार्तंड आणि मदरसे सरकारच्या लॉकडाउनसारख्या मोहिमेत सामील होणार नाहीत.
मशिदीतील जनसमुदायाचे एकत्रीकरण आणि नमाज रोखण्याच्याही ते विरोधात आहेत. पाकिस्तानातील लोकसंख्येचा एक फार मोठा भाग मौलानांच्या प्रभावाखाली आहे. सोबतच 50 लाख मुलांच्या शिक्षणासाठी उत्तरदायी असलेली संपूर्ण मदरसा प्रणालीदेखील कट्टरपंथी शिक्षणाच्या प्रसाराचे सर्वात मोठे साधन आहे.
धार्मिक यात्रा विषाणू प्रसारात साहाय्यक
धार्मिक यात्रा सध्या पाकिस्तानात करोना संक्रमणाचे सर्वात मोठे साधन झाले आहे. पाकिस्तानात करोनामुळे झालेला पहिला मृत्यू हा सौदी अरेबियातच संक्रमित होऊन आलेल्या एका धार्मिक यात्रेकरूंचाच होता. अशाचप्रकारे करोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या इराणमधूनही धार्मिक यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानात परत येत आहेत आणि त्यामुळे करोनाने संक्रमित होऊन मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढते आहे. तथापि, या आपत्तीनंतरही पाकिस्तानातील मोठ्या धार्मिक आयोजनांवर लगाम कसल्याचे दिसत नाही. मार्चच्या सुरुवातीलाच पाकिस्तानमध्ये तबलीगी जमातने एक मोठे संमेलन आयोजित केले होते आणि त्यात जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी सामील झाले होते. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार या कार्यक्रमात अडीच लाखांपेक्षा अधिक लोक एकत्रित आले होते. तद्नंतर पाकिस्तानात “कोविड-19’शी संबंधित ज्या चाचण्या केल्या गेल्या, त्यातील 12 संक्रमित लोक या कार्यक्रमात असल्याचे आढळले.
अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने
इम्रान खान यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 120 लाख डॉलरच्या संभाव्य मदतीची (पॅकेज) घोषणा केली आहे. त्यासाठी भविष्यात मोठी उसनवारी करावी लागेल. कारण पाकिस्तानी अर्थव्यवस्थाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बॅंक, सौदी अरेबिया यांच्या मदतीवर उभी आहे. तत्पूर्वी इम्रान खान यांनी जगातील सक्षम देशांकडे कर्ज फेडण्यामध्ये सवलत देण्यासाठी एखादी व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली होती. जेणेकरून पाकिस्तान व त्यासारखे देश आपली आर्थिक बिकटावस्था काही प्रमाणात सावरू शकतील.
करोना महामारीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. मार्च महिन्यातच जागतिक गुंतवणूकदारांनी पाकिस्तानच्या कॅपिटल मार्केटमधून सुमारे 1.388 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे भांडवल काढून घेतले. तसेच “हॉट मनी’ बाहेर जाण्याचे प्रमाणही 1.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. हा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा झटकाच आहे. एकत्रितरित्या पाहिले तर एका अंदाजानुसार पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला येत्या काही महिन्यांत 8.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झेलावे लागेल. पाकिस्तान सध्या एक अतिगंभीर स्थितीत अडकत चालल्याचेही दिसते. कारण, जर शहरे शटडाउन केली नाहीत, तर त्याच्या मोठ्या लोकसंख्येसमोर जगण्याचे संकट निर्माण होईल आणि शटडाउन केले, तर त्या देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडून पडेल व देशातील लोक मोठ्या प्रमाणावर उपासमारीने मरतील.
मोठा धोका चीनबरोबरील जवळीक
पाकिस्तानमध्ये उद्भवलेला करोनाचा सर्वात मोठा धोका चीनबरोबरील त्याच्या जवळीकीत असल्याचेही दिसते. डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये करोनाचा प्रकोप होताच जगभरातील देश चीनमधील आपल्या नागरिकांना माघारी बोलावत होते. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे राष्ट्रपती मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीला आपल्या नागरिकांना चीनमधून माघारी बोलावण्याऐवजी तेथेच थांबावे म्हणून सांगत होते.
पाकिस्तानमध्ये करोनाचा विषाणू इतक्या जलदगतीने संक्रमित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या देशाच्या पश्चिमेकडील खुल्या सीमा. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार फेब्रुवारीनंतर पाकिस्तानात 9 लाख 75 हजार 634 हून अधिक नागरिकांनी देशात प्रवेश केला.
पाकिस्ताननेही आता आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या असल्या तरी चिनी नागरिकांच्या देशांतर्गत हालचाली हा चिंतेचा विषय आहे. कारण, पाकिस्तानचे चीनशी मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध आहेत, यानिमित्ताने खूप मोठी चिनी लोकसंख्याही पाकिस्तानात स्थायिक झालेली दिसून येते. त्यांच्या चीनमधील प्रवासामुळेही करोनाचा धोका आणखीन वाढू शकतो. मोठ्या प्रमाणात शरणार्थींची ये-जा, हिंसाचाराच्या घटना, शिया तीर्थयात्रींचा इराणमधील प्रवास, वाढती तस्करी आणि कामाच्या शोधार्थ पाकिस्तानात इतर देशांमधून दाखल होणारे नागरिक या कारणांमुळे करोनाचा प्रकोप पाकिस्तानमध्ये कैकपटीने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
“एलओसी’वरती सतर्क राहण्याची गरज
पाकिस्तानमधील करोना वाढीचा भारतावर काय परिणाम होईल? पाकिस्तान मीडियामध्ये आलेल्या माहितीप्रमाणे पाकिस्तान आपले करोनाग्रस्त ट्रीटमेंट करता पाकिस्तानी ऑक्युपाइड जम्मू-काश्मीर किंवा गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाठवत आहे. यामुळे त्या भागांमध्ये करोनाची लागण नक्कीच वाढणार आहे. अशाप्रकारे सगळ्या करोनाग्रस्तांना एकत्र आणण्याचा प्रयत्न इतर कुठलाही देश करत नाही. यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान भारत लाइन ऑफ कंट्रोलमधून करोनाग्रस्त दहशतवादी भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून भारताने “एलओसी’वरती अजून जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.