मुंबई – नवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. तर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असा इशारा मागील चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. सरकार त्यांचं म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही. कडाक्याच्या थंडीत त्यांच्या अंगावर थंड पाण्याचा मारा केला जात आहे. भांडवलदारांच्या हितासाठी भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.
शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरले असताना आडमुठी भूमिका न घेता त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सरकारचे कर्तव्य आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी #SpeakUpForFarmers मोहिमेत सहभागी व्हा!, असे आवाहन देखील थोरात यांनी ट्विटद्वारे केले आहे.