अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून रोहित्र केले बंद
जामखेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातून बेकायदा पाणीउपसा टाळण्यासाठी महावितरण, पाटबंधारे व नगरपालिकेचे अधिकारी तसेच आ. रोहीत पवार यांच्या खाजगी कर्मचाऱ्यांनी तलावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली अखेर अधिकाऱ्यांनी रोहित्र बंद करून अवैध पाणीउपसा टाळण्यासाठी पुढाकार घेतला.
शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ऐन पावसाळ्यात कोरडेठाक पडला होता. ऑक्टोबरच्या अखेरच्या पंधरवड्यात थोड्याफार पावसावर तलावात 30 टक्के पाणीसाठा झाला होता. मागील वर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे तलावात पाणी आले नव्हते. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून शहराला 38 टॅंकरने पाणीपुरवठा चालू होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.
नागरिकांना 20 ते 25 दिवसांनी पाणीपुरवठा केला गेला होता. यावेळी आ. रोहीत पवार यांनी स्वतःच्या खाजगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली होती. तसेच नगरपालिकेने आपल्या निधीतून 21 प्रभागात 21 टॅंकर चालू करून पाणीटंचाईवर मात केली होती. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची झळ बसली नाही.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तलावात 30 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. यामुळे टॅंकरने होणारा पाणीपुरवठा बंद झाला. नागरिकांनी पाणीटंचाई संदर्भात सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यामुळे शहराला भुतवडा तलावातून सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. व तो आजतागायत चालू आहे. तलावात असलेल्या या पाण्यामुळे शहराचा वर्षभराचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
डिसेंबर अखेर सध्या तलावात एकुण 25 टक्के पाणीसाठा असुन यामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा 18 टक्के शिल्लक आहे. शहराला पाणीटंचाईची झळ बसू नये व तलावातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव रहावा तसेच तलावातून 250 ते 300 वीजपंपद्वारे पाणी उपसा करुन हे पाणी रब्बी पिकांना देण्यात येते. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई नैसर्गिक होऊ नये, म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
आ. पवार यांनी देखील याची दखल घेऊन आठ दिवसांपूर्वी पाणी नियंत्रण समितीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना याबाबत सुचना केल्या होत्या. तसेच तलावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. परंतु तरीही काही शेतकऱ्यांनी तलावात वीजपंप टाकून पाणी उपसा सुरू केला होता. याची खबर लागल्यानंतर पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता रामभाऊ ढेपे, नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी आजिनाथ गिते व महावितरणचे शाखा अभियंता गोकूळ गावीत यांनी भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली, परंतु शेतकऱ्यांनी पाणीउपसा सुरुच ठेवला.
त्यामुळे अधिकाऱ्यांनी तेथे असलेले रोहित्र बंद केले व सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरू ठेवला. मात्र आता सिंगल फेजवर वीजपंप देखील चालू राहातात, असे वीजपंप उपलब्ध झाल्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी तलावातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवून त्याचे संरक्षण करण्याची गरज आहे.
सध्या भुतवडा तलावात 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये उपयुक्त फक्त 18 टक्केच शिल्लक आहे. अवैध पाणीउपसा होऊ नये, म्हणून पथक स्थापन केले आहे. या पथकाने रोहित्र बंद केले आहेत. तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांनी अवैध पाणीउपसा करु नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील.
विशाल नाईकवाडे तहसीलदार