मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार लोकशाहीला कुलुपबंद करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
उद्यापासून विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशने घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील, तेवढी टाळण्याचा प्रयत्न या छोट्या अधिवेशनातून केला जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.
संसदेमध्ये अनेक राज्यांचे अधिवेशन दीर्घकाळ चालू शकते, पण राज्य सरकारची अधिवेशन घेण्याची मानसिकता नाही. या सरकारमध्ये रोखशाही आणि भोगशाही सुरू आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार राज्याच्या जनतेने कधीही पाहिला नाही. स्थगिती, खंडणी, वसुली, लूट, भ्रष्टाचार याचे जेवढे प्रकार सरकारच्या काळात पाहायला मिळतात, तेवढे कधीच पाहायला मिळाले नाहीत, अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
विरोधकांनी बोलू नये, त्यांची तोंडे बंद करण्यासाठी एकेक वर्षासाठी आमदारांना निलंबित करणे राज्याच्या इतिहासात अक्षरश: काळिमा फासण्याचे काम सरकारच्या दबावाखाली होत आहे. ज्या घटना घडल्या नाहीत, त्यांची कारणे सांगून आमच्या आमदारांना निलंबित केले आहे.
वर्षभरासाठी निलंबित करण्याचे एवढेच कारण आहे की आपल्या स्वत:च्या आमदारांवर सरकारला विश्वास नाही, सरकार कधीही अडचणीत येऊ शकते असा ठाम विश्वास यांच्या मनात आहे. म्हणून मुद्दाम आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सरकारने केला आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार असल्याचे माध्यमांत मी वाचले. 12 आमदार बाहेर ठेवून अध्यक्षांची निवडणूक घेणे ही सरकार असुरक्षित असल्याची कबुली आहे. विधीमंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झालेली असताना नियमबाह्य पद्धतीने अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा घाट घातला जात आहे त्यावरून 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते.