नवी दिल्ली: प्रत्येक घराला वीज पुरविण्यासाठी आता केंद्र सरकार राज्यांच्या भरवशावर अवलंबून राहू इच्छित नाही. वीज वितरण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी रालोआ सरकार राष्ट्रीय स्तरावर वीज वितरण कंपनी निर्माण करणार आहे. मागील कार्यकाळात सरकारने प्रत्येक घराला वीजजोडणी देण्याचे लक्ष्य बाळगले होते, जे बऱ्याच अंशी पूर्ण झाल्याने सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे.
प्रत्येक घरात वीज पोहोचविण्यासाठी एनटीपीसी, पॉवर ग्रिड आणि पीएफसीकडून संयुक्त स्वरुपात कंपनी निर्माण केली जाणार आहे. रालोआ सरकारच्या मागील कार्यकाळातच याविषयक प्रस्तावावर चर्चा झाली आहे. नव्या सरकारने याच्याशी संबंधित कृती योजनेला वेग दिला आहे. ऊर्जा मंत्रालयाने कंपन्यांकडून तपशीलवार अहवाल मागविले आहेत. राज्यांसोबत याकरता करार केले जाणार आहेत.