पुणे – “राज्यात आमचे तीन पक्षांचे आघाडीचे सरकार आहे. पदे कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना सरकारमध्ये संधी देता येत नाही. त्यामुळे काही नेते नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आम्ही त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करू असे,’ असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी व्यक्त केले.
एका कार्यक्रमानिमित्ताने ते पुण्यात आले असताना बोलत होते. थोरात म्हणाले, “राज्यात आमच्या सध्या बैठकांवर बैठक सुरू असून नेत्यांची धावपळ आहे. खाते वाटपातून समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र पदांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येकाला पद देता येत नाही. त्यामुळे काही नेते नाराज असले, तरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नक्की होणार आहे. सध्या खातेवाटपाची धावपळ सुरू आहे. खातेवाटपामध्ये वेळ गेला असला, तरी हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करेन.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत बोलताना थोरात म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांना हेक्टर आणि एकरमधला फरक कळत असला, तरी त्यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळालेला नाही. आम्ही शेतकऱ्यांना नक्की न्याय देऊ. सध्या सत्ता नसल्यामुळे विरोधकांची अवस्था तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे, म्हणूनच त्यांच्याकडून अशाप्रकारे भावना भडकवणारी विधाने केली जाताहेत.’ मी भरपूर जेष्ठ नेता आहे. इतरांना संधी द्यावी, या उद्देशाने अहमदनगरचे पालकमंत्रीपद स्वीकारले नाही. मंत्री नसलो तरी त्या जिल्ह्याचा पालक मीच राहीन, असेही थोरात यांनी सांगितले.