जामखेड: कर्जत तालुका हा अविकसितच राहावा, तसेच सिंचन प्रकल्प मार्गी लागु नयेत असेच प्रयत्न कॉंग्रेस सत्तेच्या काळात झाले. मात्र युती सरकारने तालुक्यातील अमृतलिंगसारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेवून या भागाच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेण्याची धमक दाखविली, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.ना.राम शिंदे यांनी केले.
तालुक्यातील खर्डा येथे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणुक प्रचारार्थ आयोजित सभेत ना. शिंदे यांनी या भागाच्या पाणीप्रश्नाला कॉंग्रेस आघाडीचे सरकारच जबाबदार असल्याचा थपका ठेवला. वर्षानुवर्षे या भागाचे सिंचन प्रकल्प मार्गी लागु नयेत, असेच प्रयत्न झाले. या भागाचा पाणीप्रश्न सुटला तर हा परिसर विकसित होईल, अशी भिती या नेत्यांच्या मनात होती. त्यामुळेच या भागाला नेहमीच सापत्नतेची वागणुक मिळाली असल्याचे ना.शिंदे म्हणाले.
डॉ. विखे पाटील म्हणाले, निवडणुकीत मतदारांपुढे मांडण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे आता राहीलेले नाहीत. केवळ व्यक्तिव्देशाचे राजकारण त्यांच्याकडून आता सुरु झाले आहे. आम्ही शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर बोलतो, यांना मात्र प्रश्नांचे कोणतेही देणे-घेणे नाही. शेतकरी आणि सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेमध्ये माझा प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वैजनाथ पाटील, संजय गोपाळघरे, रवि सुरवसे, भगवानराव मुरुमकर, सुर्यकांत मोरे, सुभाष आव्हाड, मकरंद काशीद, सुधीर राळेभात उपस्थित होते.