Nagpur Violence : नागपूरमध्ये रात्री सोमवारी झालेल्या हिंसाचारात चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. शहरातील भालदारपूर परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातलं वातावरण पेटलेलं असून त्या मुद्यावरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटात हिंसक हाणामारी झाली. नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. या हिंसाचारादरम्यान अनेक जण जखमी झाले, पोलिसांनाही दुखापत झाली. तेव्हापासूनच नागपूरमध्ये आणि राज्यभरातही तणावाचे वातावरण आहे. याच राड्यादरम्यान विनयभंगाची घटना घडली आहे.
जमावातील काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसेच अश्लील शेरेबाजीही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीने वार, पोलिसांवर दगडफेक, ते चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेली आहे. त्यामुळे या संतापजनक घटनेने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
रस्ता सूनसान
अशोक चौकापासून ते इतवारीपर्यंत तसेच महालपासून तर शुक्रवारी तलावापर्यंतचा रस्ता सूनसान होता. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते. या भागातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पोलिसांनी १५० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
आत्तापर्यंत 46 आरोपींना अटक
नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने 21 पर्यंत पीसीआर दिला आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. आतापर्यंत एकूण 46 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. सर्व आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एटीएसकडूनही नागपूर हिंसाचाराचा समांतर तपास सुरू आहे.