पुणे – राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत मी कोणतेही वक्तव्य केले नाही. राज्यपालांना बदनाम करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सांत्वनाला गेल्यानंतर अशा चर्चा करणे माझ्या परंपरेने आणि संस्कृतीने शिकवले नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला उत्तर दिले.
पाटील म्हणाले की, अशा “स्टोरी’ बनवण्यात कॉंग्रेस माहीर आहे. लोक यातून स्वत:ची करमणूक करून घेतात. मुश्रीफ यांचा आरोप हास्यास्पद आहे. माझी दृष्टी अजूनही स्ट्रॉंग आहे. मास्कमुळे व्यक्ती ओळखता आली नाही असे कसे होईल. त्यांचे उजवे-डावे भैय्या माने, जवळचे कार्यकर्ते राजेश लाटकर तेथे बसले होते.
हा राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो अतिशय चिंताजनक आहे. घटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राचे प्रमुख राज्यपाल आहेत. त्यांनी शपथ दिल्याशिवाय कोणी मुख्यमंत्री बनू शकत नाही; इतके ते उच्च स्थान आहे. कधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यावर कुत्सितपणे बोलतात, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात हे न समजणारे आहे. परंतु आम्ही घटना मानतो, त्यादृष्टीने राज्यपालांचे स्थान मानतो. त्या पदाची गरिमा राखली पाहिजे, असे मला वाटते. त्याप्रमाणे राज्यपालांनी 12 जागा घोषित कराव्यात की, न कराव्यात आमचा त्यात काय संबंध आहे?, असे पाटील यांनी नमूद केले.