मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मंत्रालयासमोर एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला ती व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत असून त्याचे नाव राजू चन्नाप्पा हुलगुंडे असे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजू हुलगुंडे हे 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
या घटनेने मंत्रालयात एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाव घेत राजू हुलगुंडे यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच राजू हुलगुंडे यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या माळवट येथे राजू चन्नाप्पा हुलगुंडे हे राहतात. ताडकळस ते पालम या रस्त्याच्या थकीत कामाचे पैसे मिळण्यासाठी ते वारंवार चकरा मारत होते. 25 ऑक्टोबर 2021 पासून ते यासाठी तासतत्याने पाठपुरवठा करत होते. मात्र, पैसे न मिळाल्याने ते नैराश्येत होते.