नवी दिल्ली : बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवात अज्ञात धर्माधांनी अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले करून त्यांचा विध्वंस केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या वेळच्या दंगलींमध्ये चार जण ठार व अनेक जण जखमी झाल्यामुळे २२ जिल्ह्य़ांमध्ये निमलष्करी दले तैनात करणे सरकारला भाग पडले. दरम्यान भारताने यावरुन नाराजी जाहीर केली असून यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
बांगलादेशातील ही घटना विचलित करणारी असल्याचे म्हटले आहे. तसंच भारतीय उच्चायुक्त आणि दूतावास सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना बांगलादेशने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या तात्काळ कारवाईची भारताने दखल घेतली असल्याची माहिती दिली.
या संपर्ण घटनेवर भारताची नेमकी प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “बांगलादेशमधील विचलित करणारे काही रिपोर्ट आले आहेत. यामध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांवर हल्ला करण्यात आल्याचाही समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेश सरकारने तात्काळ पावलं उचलली याची आम्ही दखल घेतली आहे. त्यांनी तिथे निमलष्करी दले तैनात केलं”.
“तसंच बांगलादेशमध्ये सुरु असलेलं दुर्गा पूजा सेलिब्रेशन हे सरकारी यंत्रणांकडून तसंच लोकांकडून मिळणाऱ्या मदतीमुळेच सुरु असल्याची दखलही आम्ही घेतली आहे. आमचे उच्यायुक्त आणि राजदूत तेथील सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.