शिरूर तालुक्यात असणारे बॅंकांचे एटीएम असुरक्षित झाले असून, बॅंक अधिकारी हे एटीएममधे सुरक्षारक्षक ठेवत नाही, या गैरफायदा चोरटे घेतात. शिरूर तालुक्यात रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर या भागात अनेकवेळा एटीएम चोरी, चोरीचे प्रयत्न होऊनही बॅंक अधिकारी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे एटीएम सुरक्षा राम भरोसे दिसत आहे.
शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी बॅंकांनी नागरिकांना लवकर आणि हवे तिथे पैसे मिळावे म्हणून एटीएम सेंटर सुरू केले. अनेक वर्दळीच्या ठिकाणी ते बसवण्यात आले. त्यामधे लाखो ते कोटी रुपयांपर्यंत रक्कम ठेवली जाते. हा देशाचा आणि जनतेचा पैसा आहे. याबाबत बॅंक अधिकारी यांनी सतर्क असणे गरजेचे हवे. एवढा मोठ्या प्रमाणात पैसा ठेवताना त्यांची सुरक्षितता ही तेवढीच महत्वाची आहे; परंतु बॅंक अधिकारी किंवा प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शिरूर तालुक्यात अनेक एटीएम आहेत. तेही कराराने घेतलेल्या जागेत आतमध्ये एटीएम आणि सीसीटीव्ही यंत्रणा असते; परंतु सीसीटीव्ही यंत्रणा या एटीएमची सुरक्षा करू शकत नाही. लाखो रुपये ज्या यंत्रात आपण ठेवतो त्याचे संरक्षण करण्यासाठी 24 तास सुरक्षारक्षक ठेवणे हे बॅंकांचे काम आहे; परंतु याकडे बॅंका दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून आले आहे. एटीएम जेथे बसवले जाते तेथील सर्व विमा हा बॅंका विमा कंपनीकडून उतरवत असतात. त्यामुळे एटीएम फोडले काय, चोरून नेले काय? त्यातील रक्कम चोरी गेली, याबाबत बॅंक अधिकारी यांना देणे घेणे नाही. एटीएममध्ये चोरी किंवा फोडले तरी हे बॅंक अधिकारी लवकर येत नाही, पोलिस खाते अनेक वेळा फोन करूनही ते हे बॅंक अधिकारी त्यांच्या कडे लवकरच तक्रार देण्यासाठी येत नाही.
बॅंक किंवा एटीएममध्ये असणारा पैसा हा जनतेचा व देशाचा आहे. यांची संरक्षण घेणे हे बॅंकेचे कर्तव्य आहे. आपण जनतेचे नोकर आहोत. हे बॅंक अधिकारी यांनी लक्षात घ्यायला हवे. बॅंक अधिकारी यांच्या बेजबाबदारपणा मुळे अनेकवेळा पोलीस प्रशासनाला ही डोकेदुखी होत असते. बॅंक एटीएम बसवणे, त्यात पैसे टाकणे यांसाठी बॅंकांनी एजन्सी नेमल्या आहेत. हे ठीक असले तरी एटीएम बॅंकांच्या नावाने आहे. त्यात देशाचा पैसा आहे तो अशाप्रकारे पैसा चोरी होत असेल आणि त्यासाठी बॅंक प्रशासन गंभीर नसेल तर त्यावर रिझर्व बॅंकेने कार्यवाही करणे गरजेचे आहे आणि त्यामुळे देशाचा पैसा सुरक्षित राहणार आहे.