मुंबई – पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी. उत्तर प्रदेशात रिपाईचे संघटन चांगले आहे. त्यामुळे मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे (बसपा) गेलेला दलित मतदारवर्ग भाजपकडे वळवता येईल, असे वक्तव्य रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
रामदास आठवले यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. आगामी वर्षात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसदर्भात यावेळी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि रिपाइंचे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर हेदेखील उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे. उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले आहे. उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने आपल्याकडे वळविला आहे. मात्र, आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा आपल्याकडे वळवता येईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले.