हजारो स्पर्धकांनी नोंदवला सहभाग; पोलीस अधिकारी दीपाली यादव यांच्यासह सहकाऱ्यांनी वाढवला उत्साह
भुईंज (वार्ताहर) – भुईंज येथे ग्रीन पॉईंट संस्थेने व विविध क्षेत्रातील व्यावसायिक, पोलीस अधिकारी, तरुण युवक यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेली भुईंज व्हिलेज मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी या स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी भुईंज परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन युवक-युवती राज्यस्तरीय खेळाडू, सातारचे आयर्न मॅन डॉ. दीपक निकम, भुईंज परिसरातील वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. तसेच सातारा येथील पोलीस अधिकारी दीपाली यादव व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सातारा ते भुईंज हे अंतर धावत पार करून मॅरेथॉन उत्साह वाढविला.
स्पर्धेचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजित केलेले झुंबा नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी झुंबा नृत्याच्या तालावर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच मंत्रमुग्ध होत काही क्षण ठेका धरला. उत्तम आरोग्यासाठी धावण्याचा संदेश देणारी मॅरेथॉन स्पर्धा भुईंजमध्ये प्रथमतःच आयोजित केली होती. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन कऱण्यात यावे, अशी मागणी जमलेल्या सर्व युवकांनी केली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सातारा, पुणे जिल्ह्यातील नामवंत खेळाडू तसेच भुईंज व आजूबाजूच्या परिसरातील 600 स्पर्धकांनी आपला उस्फूर्त सहभाग नोंदवून स्पर्धेची शोभा वाढविली स्पर्धकांना सर्व प्रथम धावण्याचा मार्ग सांगण्यात आला व सकाळी 6:30 वाजता ग्रीन पॉईंट कंपनीचे सहभागीदार व आयोजक धनंजय पावशे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर 3 किमी, 5 किमी,10 किमी अशा तीन गटात विभागलेल्या स्पर्धकांनी धावण्यास सुरुवात केली. हे स्पर्धक भुईंज येथील शिवाजी मैदानापासून घुमट, रस्त्याने किसन वीर कारखाना पुलाखालून चाहुर, चिकनेवाडी, वारागडेवाडी, साखर कारखाना व परत शिवाजी मैदान अशी धावण्यात आली. यानंतर स्पर्धेच्या आयोजक व भारतीय परराष्ट्र अधिकारी राजेश स्वामी यांच्या पत्नी संजीवनी स्वामी यांच्या हस्ते मॅरेथॉन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची पारितोषीके देण्यात आली.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारतीय परराष्ट्र अधिकारी राजेश स्वामी व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी विशेष सहकार्य केले व अध्यक्ष महेश जाधवराव, उपाध्यक्ष उल्हास जाधवराव, रोहनराज भोसले, स्मिता कुंभार, सागर दळवी, निखिल केंडे, श्रीपाद जाधवराव, किशोर बोटे, गौरव जाधवराव, आनंद जाधवराव, तेज बाबर, राहुल तांबोळी, मयुरी पिसाळ यांनी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्विरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले व बक्षीस वाटपाचे सूत्रसंचालन जयवंत पिसाळ यांनी केले.