मुंबई – राजभवनात ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यातील संपूर्ण घडामोडी राजकीय रंग चढला होता.
नव्या सत्ता समीकरणाला विविध मुद्यांची भावनिक जोड देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होत होता. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या सत्ता समीकरणावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका झाली होती. यावर प्रथमच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “जर रामप्रहराला शपथ घेतली असेल, तर तुम्ही त्यावर प्रहार कशाला करता,” असा उलट सवाल केला, विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी सरकारने नावे पाठविली नाहीत, सरकारच सुस्त आहे, टीका मात्र माझ्यावर होते असं सांगत भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली त्याला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेणारे जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.