पुणे – गेल्या दहा दिवसांत करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात 60 हजारांच्या आसपास पण स्थिर झाली आहे. दुसरी लाट आल्यापासून हा आकडा स्थिरावण्याचा सर्वात मोठा कालावधी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेने शिखर (पिक) गाठले असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील नव्या बाधितांची संख्या गुरुवारी 61 हजार 695 होती. मात्र रविवारी ती विक्रमी अशी 63 हजार 294 होती. ही संख्या महाराष्ट्रात साथ पसरल्यानंतर म्हणजे गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून सर्वोच्च होती. त्यामुळे महाराष्ट्रातील बाधितांची संख्या शिखरावर पोहोचल्याचे मानण्यात येत आहे.
तसे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बाधितांच्या संख्येत घट होत जात असल्याचे आपल्याला पहायला मिळेल, असे भारतातील साथीचे विश्लेषण करणारे कॉम्प्युटर मॉडेल चालवणाऱ्या पथकातील सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल
यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये येत्या सात ते दहा दिवसांत बाधितांची संख्या कमी होताना दिसू लागेल. गेल्या काही दिवसांत आमच्या मॉडेलने अंदाज बांधल्याप्रमाणे तेथे संसर्गक्षम पण लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या वाढत आहे. सध्याची स्थिती पाहता देशांत पिकची अवस्था 25 एप्रिलला येऊ शकते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
अग्रवाल यांचे पथक वापरत असलेल्या कंम्प्युटर मॉडेलने ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत वर्तवलेले अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. मात्र, दुसऱ्या लाटेची तीव्रता इतक्या वेगाने वाढेल याचे अनुमान त्यांनी मांडले नव्हते. अग्रवाल म्हणाले, नवी वस्तूस्थिती समोर आल्यानंतर ती या मॉडेलमध्ये वापरली जाते.