मोहाली – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस “रोहित ब्रिगेड’ने गाजवला. मोहालीमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत दिवसअखेर भारताने 6 बाद 357 धावा केल्या. यात ऋषभ पंतची 96 धावांची स्पेशल इनिंग हे पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विराट कोहलीला शतक झळकावण्यासाठीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. विराट कोहलीचा शंभरावा कसोटी सामना असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व आहे. या खास कामगिरीसाठी विराटचा सुरुवातीला सत्कार करण्यात आला.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल या जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनाही चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या धावसंख्येत करता आले नाही. रोहित 29, तर मयंक 33 धावा करून माघारी परतले. यानंतर विराटच्या शतकाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांची आज निराशा झाली. हा सामना रंगात आलेला असताना विराट 45 धावा करून बाद झाला. विराट ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून अनेक चाहत्यांचा डोळ्यावर विश्वास बसला नाही. श्रीलंकेचा स्पिनर लसिथ एम्बुल्डेनियाचा चेंडू बॅकफूटवर खेळण्याचा विराटचा प्रयत्न फसला. त्याला काही कळण्याच्या आता चेंडू विराटच्या बॅटला चकवून स्टंपला लागला.
विराट कोहली आऊट झाल्यानंतर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आला. त्यानंतर लगेच हनुमा विहारी बाद झाला. दुसरीकडे पंतने सावध खेळी सुरू ठेवली. त्याने श्रेयस अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर पंतने जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करत संघाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. पंतने त्याचे अर्धशतक 73 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने पूर्ण केले होते.
अर्धशतकानंतर त्याने धावांचा वेग वाढवला. पंतने 97 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीन 96 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसअखेर खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा 45 आणि आर. अश्विन 10 धावांवर खेळत होते. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनियाने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) ः 85 षटकांत 6 बाद 357 (रोहित शर्मा 29, मयंक अग्रवाल 33, विराट कोहली 45, हनुमा विहारी 58, ऋषभ पंत 96, रवींद्र जडेजा खेळत 45, आर. अश्विन खेळत आहे 10. लसिथ एम्बुल्डेनिया 2-107, धनंजया डी सिल्वा 1-47)