वीसगाव खोरे – उत्रौली (ता. भोर) येथे एका शेतकऱ्याने वयाच्या 79 व्या वर्षी पारंपरिक भात पिकाला फाटा देत फळबाग फुलवली असून, “गोविंद बाग’ नावाचे मॉडेल फार्म विकसित केले आहे. नारळ, चिक्कू, आंबा, पपई, पेरू, शेवगा, लिंब, जांभूळ यांसारख्या फळझाडांबरोबर पारंपरिक पिके आंतरपिके म्हणून घेतली आहेत. यात ज्वारी, घेवडा, वाटाणा, हरभरा, यांचा समावेश आहे. 15 एकर क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचनाची सोय केली असून, जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष केंद्रित केले आहे.
उत्रौलीचे शेतकरी गोविंद विनायक चंद्रस हे 2003 मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मार्गमधून इलेक्ट्रिशन म्हणून निवृत्त झाले आहेत. लहानपणापासून शेतीची आवड असणाऱ्या चंद्रस यांनी निवृत्तीनंतर पारंपरिक भात शेतीला फाटा देत शेतात फळबागांची लागवड करून शेतीपूरक व्यवसाय सुरू करत गोविंद बाग नावाचे मॉडल फार्म विकसित केले.
चंद्रस यांनी वडिलोपार्जित शेतीत नवनवीन प्रयोग करीत नारळ, चिक्कू, आंबा, पपई, पेरू, शेवगा, लिंब, जांभूळ यांसारख्या फळझाडांची लागवड केली आणि त्याचबरोबर पारंपरिक पिके आंतरपिके म्हणून घेतली आहेत. जमिनीची मशागत करून त्यात शेणखताचा वापर करून फळबाग लागवडयोग्य जमीन बनवली. गावापासून दूर नदी किनारी शेतजमीन असल्याने कामाला मजूर मिळत नसल्यामुळे पारंपरिक पिके न घेता फळबागेचा निर्णय घेऊन सत्यात उतरवला.
फळबागेतून लाखोंचे उत्पन्न –
गोविंद चंद्रस यांनी 60 नारळ, 50 चिक्कू, 50 पेरू, 70 पपई, 50 केळी, 50 आंब्याची झाडे लावली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून नारळ, पेरू, चिक्कू, पपई ही पिके मिळू लागल्याने वयाच्या 79 वर्षी सुध्दा नियमित शेतीत जाऊन फळबागेतील देखभाल करत लाखो रुपयांचे उत्पादन ते घेत आहेत.
पारंपरिक पीकपद्धतीवर भर न देता मजूर टंचाईवर मात करत फळबाग लागवड केली. सेवा निवृत्तीनंतर व्यक्ती किरकोळ कामे करतात, व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आजार जडतात. यासाठी शरीराची हालचाल व्हावी, वेळचा सुदपयोग व्हावा या उद्देशातून ही बाग फुलवली. फळबागेतून व्यायाम होतो, वेळ कसा जातो हे कळत नाही आणि वयाच्या 79 वर्षी मी ठणठणीत आहे.
– गोविंद चंद्रस, प्रगतशील शेतकरी (उत्रौली)