नगर -लम्पी स्किन या घातक आजाराचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. आता जिल्ह्यातील 180 गावांमध्ये हा आजार पोहोचला असून तब्बल 2219 जनावरे बाधित झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने या जनावरांवर तातडीने उपचार केल्याने यातील 748 जनावरे बरी झाली आहेत. दरम्यान, आजाराचा उद्रेक झालेल्या गावांपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असणारी 942 गावांवर विभागाने लक्ष केंद्रीत केले असून या गावातील 9 लाख 73 हजार 818 जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.
लम्पी आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बाधित जनावरांना वेगळे करणे तसेच पशुधनाचे लसीकरण करणे यांसारख्या उपाययोजना सुरू आहेत. आजारी जनावरांवरील उपचारासाठी सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाधित जनावरे आढळल्यास त्या गावापासून पाच किलोमीटर अंतरात येणाऱ्या अन्य गावांतील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू असून आतापर्यंत 6 लाख 87 हजार 750 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राशीनमध्ये अधिकारी-डॉक्टरांची गर्दी
जिल्ह्यात सध्या कर्जतमध्ये सर्वाधिक लम्पी बाधित जनावरे आहेत. राशीन आणि आसपासच्या गावात आजार वेगाने फैलावत आहे. येथे आतापर्यंत 27 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होण्यामागे काय कारणे आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.