बेवारस मृतांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन
पुणे: सर्वपित्री अमावास्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमीच्या कलाकारांनी एकत्र येऊन केला विधीपूर्ण
अपघात किंवा इतर कोणत्याही कारणाने अनेक जण मृत्युमुखी पडतात. काही मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड असते, त्यामुळे असे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. आप्तेष्ट नातेवाईक कोणीही नसल्याने त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार देखील होत नाही. अश्या बेवारस मृतदेहांच्या अस्थी विसर्जित कोण करणार असा विचार करून गेल्या ९ वर्षापासून सातत्याने बेवारस मृतांच्या अस्थी विधीवत पूजन करून विसर्जित करण्याचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने करण्यात येत आहे.
मृत व्यक्तींची जात कोणती हे न बघता जाती-धर्माच्या पलीकडे जात सदभावनेतून अकादमीच्या कलाकारांनी अस्थींचे विधीवत पूजन करून विसर्जन केले. त्यामुळे अखेर बेवारस मृतांच्या अस्थींची प्रतिक्षा संपली आणि त्या बेवारस मृतांच्या आत्म्याला शांती लाभली.
सर्वपित्री अमावास्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी न्यासच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कला अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कुंदेन, अमर लांडे, रोमा लांडे, सेवा मित्र मंडळ मंडळाचे अध्यक्ष नितीन झंझाड, साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा, संजय तांबोळी, वर्षा तांबोळी, रूपाली निवदेकर, सारिका अगज्ञान, सुषमा खटावकर, भाई ताम्हाणे व ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.