लखनौ -समाजवादी पक्षानेही आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. अटुट वचनपत्र नावाने जारी करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशवासीयांना 300 युनिट मोफत विजेचे आश्वासन देण्यात आले असून शेतकऱ्यांनाही कृषी पंपांसाठी मोफत विजेचे आश्वासन देण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले आमचे सरकार सत्तेवर आल्यावर पंधरा दिवसांच्या आत दिली जातील, असेही या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांना प्रत्येकी 25 लाख रुपयांच्या मदतीचे मोठे आश्वासन या जाहीरनाम्यात आहे.
आमचे सरकार सत्तेवर आल्यास गरिबांसाठी दहा रुपयांत भोजनाची व्यवस्था केली जाईल असे या पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. त्यासाठीच जाहीरनाम्यात समाजवादी कॅन्टीनची योजना समाविष्ट करण्यात आली आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी सरकारी नोकरीत 33 टक्के आरक्षण, 12 पास विद्यार्थ्यांना लॅपटॉप, शेतकऱ्यांसाठी व्याजमुक्त कर्ज योजना, सन 2025 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा संकल्प या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. सन 2005 नंतर सरकारी नोकरीत घेण्यात आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे महत्त्वाचे आश्वासन यात देण्यात आले आहे. सध्या जुनी पेन्शन योजना बंद असून सध्या नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे. त्यात अत्यल्प पेन्शन दिली जाते त्यामुळे लोक या पेन्शन योजनेवर नाराज आहेत.