कौतिकराव ठाले-पाटील : डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी साधला संवाद
पुणे – “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे लोकांऐवजी 19 लोक अध्यक्ष निवडत असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रिया संकुचित झाली आहे. मात्र अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया बहुमताने बदलल्यामुळे त्यातील गुण-दोष पाहावे लागतील. प्रयोग करून पाहिल्यानंतर बदल करायचा की नाही, याचा विचार करता येईल,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित “मसाप गप्पा’ या उपक्रमात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ठाले-पाटील यांच्याशी संवाद साधला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल ठाले-पाटील यांचा परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते.
ठाले पाटील म्हणाले, “लोकशाही प्रक्रियेत एखाद्या निर्णयाच्या बाजूने बहुमत असताना अल्पमताला काही किंमत नसल्याने नव्या प्रक्रियेत तूर्तास तरी बदल होणे शक्य नाही. प्रयोग करून पाहिल्यानंतर बदल करायचा की नाही, याचा विचार करता येईल. बदल होणे आतातरी शक्य नाही.’
साहित्य संमेलन आयोजित करणे, हेच साहित्य महामंडळाचे काम आहे. त्यासाठी सरकारकडून निधी घेतला, तर मिंधेपणा येतो. मात्र हे माहिती असूनही अनेकदा मंडळाकडून शासनाकडे निधीसाठी मागणी केली जाते. तर साहित्य संस्थांकडूनही नव्या लेखक, कवींना व्यासपीठ देण्याची साहित्य संस्थांची जबाबदारी असताना बिनचुके लोकांना व्यासपीठ दिले जाते. ही साहित्य क्षेत्राच्या विकासासाठी घातक बाब आहे. नवीन लेखकांना व्यासपीठ देणे आणि प्रतिष्ठा मिळेपर्यंत विकास घडवणे ही संस्थांची मुख्य जबाबदारी आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी, तर सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.