नवी दिल्ली/ अहमदाबाद/ शिमला – प्रचंड गाजावाजा करत झालेल्या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात गुजरात या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वत:च्या राज्यात भारतीय जनता पार्टीने विक्रमी विजय मिळवला आहे. हिमाचल प्रदेशात मात्र भाजपला सत्ता गमावावी लागली. या दोन्ही राज्यांत भाजप आणि कॉंग्रेस या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होती.
मात्र यावेळी आम आदमी पक्ष हा दिल्लीतील तिसरा पक्षही दोन्ही ठिकाणी रिंगणात होता. दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता हस्तगत करणाऱ्या आपने प्रचाराचा धुरळा उडवला होता व गेल्या काही आठवड्यांपासून हा पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानीही होता. त्यामुळे या पक्षाच्या कामगिरीबाबत प्रचंड उत्सुकता होती. मात्र, आपची कामगिरी ज्या प्रकारे त्यांनी चित्र प्रोजेक्ट केले होते तशी झालेली नाही. गुजरातमध्ये त्यांना जेमतेम 5 जागा मिळाल्या तर हिमाचलमध्ये भोपळाही फोडता आला नाही.
भाजपचा विक्रम –
भारतीय जनता पार्टीची अखंडित 27 वर्षे सत्ता असलेल्या गुजरात या त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला विधानसभेच्या 182 पैकी तब्बल 156 जागा मिळाल्या आहेत. या राज्यात भाजपचा हा जागा जिंकण्याचा विक्रम आहेच. मात्र, राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत कोणत्या राजकीय पक्षाने केलेली ही सर्वोच्च कामगिरी आहे. यापूर्वी 1985 मध्ये कॉंग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या.
तेव्हा माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने हा विक्रम केला होता. त्यानंतर कोणालाही, भाजपलाही हे रेकॉर्ड आतापर्यंत तोडता आले नव्हते. 2002 मध्ये भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. ती त्यांची सर्वोच्च कामगिरी होती. तीही आता मागे पडली आहे. आता भाजपचे सगळेच प्रमुख उमेदवार विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचे वैशिष्टय म्हणजे या पक्षाने आज तीन विक्रम केले.
1. आतापर्यंतच्या सगळ्यांत जास्त जागा जिंकल्या
2. सगळ्यांत जास्त मतांची टक्केवारीही
3. जास्त फरकाने विजयी झालेल्या उमेदवारांची संख्याही सगळ्यांत जास्त
12 तारखेला शपथविधी
आजच्या विजयामुळे गुजरात भाजप आणि एकुणच देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. येत्या 12 तारखेला म्हणजे सोमवारी गांधीनगर येथील मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथविधी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावरचा आपला दृढ विश्वास व्यक्त केला आहे. मोदी यांच्या जबरदस्त करिष्म्यामुळेच हा विजय प्राप्त झाला आहे. आमचा भारतीय जनता पक्षाशिवाय अन्य कोणत्याही पक्षावर विश्वास नसल्याचे गुजरातच्या मतदारांनी दाखवून दिले आहे त्यामुळे आता आमची सगळ्यांचीही जबाबदारी वाढली आहे. आता शपथविधी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून आमची हिंमत वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.
भूपेंद्र पटेल यांनी मानले आभार
गेल्या वर्षी 13 सप्टेंबर रोजी भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. वर्षभराच्या आपल्या कार्यकाळात त्यांच्यासमोर काही समस्याही आल्या. मात्र, त्यांनी शांतपणे आपली कामगिरी यशस्वी केली. आताच्या विजयाकरता त्यांनीही नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की ही निवडणूक गुजराथी माणसाकडून लढवली जात असल्याचे पंतप्रधानांनी अगोदरच जाहीर केले होते. भूपेंद्र यांना माझ्यापेक्षा जास्त मतांनी विजयी करा असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते व बहुमताने सरकार बनवण्याचा संकल्प आम्ही केला होता. तो आता पूर्ण होतो आहे व आम्ही सरकार बनवतो आहोत.
पटेल यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटना
भूपेंद्र पटेल यांच्या जेमतेम वर्षभराच्या कार्यकाळात काही घटना घडल्या. तरीही मतदारांनी भाजपवर विश्वास व्यक्त केला आणि पुन्हा त्यांच्याकडे सत्तेची कमान सोपवली.
1. सौराष्ट्र या भागात गुजरातला पुराचा सामना करावा लागला.
2. विषारी दारूच्या सेवनामुळे 42 जणांचा मृत्यू
3. मुंद्र बंदरावर तब्बल 3 हजार कोटींचे हेरॉईन सापडले.
4. 2002 च्या बिलकीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची तुरूंगातून सुटका.
5. मोरबी येथील पूल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू
मतांची टक्केवारी
भाजप 53 टक्के
कॉंग्रेस 26.8
आप 13.6
ओवेसी, आपचा कॉंग्रेसला फटका
कॉंग्रेसचे गुजरात अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी पराभव मान्य केला आणि काय त्रुटी राहीली त्याचे आम्ही विश्लेषण करू असे ते म्हणाले. तसेच आम आदमी पक्ष आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम यांनी मत विभागणीत महत्वाची भूमिका बजावली असेही त्यांनी नमूद केले. या दोन्ही पक्षांमुळे विशेषत: कॉंग्रेसला मिळणाऱ्या मुस्लिम मतांची विभागणी झाल्याचे सुरवातीच्या विश्लेषणावरून स्पष्ट होते आहे. किमान आपला जी 13 टक्के मते मिळाली ती मते जर कॉंग्रेसकडे राहीली असती तरी कॉंग्रेसची टक्केवारी 40 पर्यंत पोहोचली असती व भाजपला आटोक्यात आणणे त्यांना शक्य झाले असते.
सलग सातव्यांदा सत्ता
सलग सातव्यांदा सत्तेवर येण्याची किमया भाजपने साधली आहे. हाही एक विक्रम आहे. अर्थात यापूर्वी प. बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सलग सात वेळा सत्तेवर येण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.