पुणे – राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघ जागावाटपाचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित बैठक घेणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षातर्फे सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, दिलीप कांबळे, योगेश टिळेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने मागील 5 वर्षांत कृषी, रोजगार, औद्योगिकसह सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले आहे. यामुळे लोकांचा मिळणारा प्रतिसादही मोठा असून येत्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळेल.
फडणवीस म्हणाले, देशात सर्वात जास्त औद्योगिक गुंतवणूक राज्यात झाली असून सर्वाधिक रोजगार मिळून देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव आहे. शेतकरी प्रश्न, रोजगार, सिंचन क्षेत्रात सरकारने तत्परतेने कामे केली आहेत. विशेषतः जलयुक्त शिवारमधून जलसंधारणाची कामे केली. आता पुढच्या 5 वर्षांत राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जास्त पाणी असलेल्या भागात पाणी आडवून ते दुष्काळग्रस्त भागात वळविण्यावर भर देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून दुष्काळग्रस्त भागात वॉटरग्रीड प्रकल्पाची सुरवात केली आहे. सरकारकडून जनतेच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याला लोकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून येत्या निवडणूकीत नक्कीच अभूतपूर्व यश मिळेल.
पुण्यात पाण्याचा वापर सर्वाधिक
मागील 5 वर्षांमध्ये राज्य तसेच केंद्र सरकारकडून पुण्यातील मेट्रो, रिंगरोड, इलेक्ट्रिक बस, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी “एचसीएमटीआर’ प्रकल्प, नदीसुधार अशी सुमारे 40 ते 45 हजार कोटींची विकासकामे करत आहोत. यातील अनेक प्रकल्प वेगाने सुरू असून लवकरच पूर्ण होतील. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील धरणे, सिंचन प्रकल्पाला निधी देऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पुरंदर विमानतळाच्या जागेचे भूसंपादनाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. शहरासाठी सध्या समान पाणीपुरवठा योजना सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र, पुण्यात प्रतिमाणसी पाण्याचा वापर राज्यातील इतर शहराच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.