नगर – माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदान करण्यासाठी ठरवून दिलेली वयाची अट 21 वरून 18 केली. याचा कॉंग्रेसला खूप फायदा झाला होता. देशात – राज्यात सरकार स्थापन करण्यामागे तरुण मतदारांची महत्वाची भूमिका असते. आजचा तरुण राजकारण, निवडणुका याकडे कसा बघतो, हे फार महत्वाचं आहे. कारण, यावर सरकारे ठरत असतात. जगाचा इतिहास आहे, तरुण सत्ता उलथून टाकतात.
या निवडणुकीच्या वातावरणात आजची तरुणाई राजकारण, निवडणुका याकडे कशी बघते, काय विचार करते, याचा हा आढावा. या विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी केलेली बातचीत-
मी जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची नागरिक आहे, याचा अभिमान आहेच. त्यामुळे मी निवडणूक लोकशाही प्रक्रियेत मतदान करण्याचा जो नागरिकांचा हक्क असतो, तो हक्क निभावून लोकशाहीचे हात बळकट करणार आहे. कारण, जर तुम्ही मत दिलंत, तर तुमचा नेता निवडला जाईल. जर मतदान नाही केलंत, तर इतर त्यांचा नेता निवडतील. मला वाटतं, वेळ आली आहे,
-शुभांगी करंडे एम.ए. (राज्यशास्त्र) – 2
प्रेमराज सारडा महाविद्यालय
नगरकरांचे खूप प्रश्न आहेत. इथे उद्योग नाही. तरुणाला रोजगार नाही. पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र इथे आहे, पण बरीचशी कामे पुणे विद्यापीठातुन करावी लागतात. अजूनही विद्यापीठाच्या जागेवर उपकेंद्र नाही. विद्यार्थ्यांच्या देखील एक ना अनेक समस्या आहेत. मतदान करतांना, नेता निवडतांना या बाबी बाबीचा गांभीर्याने विचार करणार आहे.
-आकाश शिंदे, प्रेमराज सारडा महाविद्यालय
“वोट फॉर चेंज’ म्हणत नगरच्या भवितव्याची सुरुवात माझ्या मतपासून करणार आहे. जात – पात – धर्म याचा विचार न करता बदलासाठी मतदान करत आलोय.
-रणजित शर्मा, प्रेमराज सारडा महाविद्यालय
चांगल्या भविष्यासाठी मतदान हे केलंच पाहिजे. मतदान केलं तरच जिल्हात, देशात, मतदार संघात प्रभावी सरकार येऊ शकेल. जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत सकारात्मक बदल घडून यावा म्हणून मतदान करणार आहे. निवडणुकीत आपल्याला खोटी आश्वासने दिली जातात, आपण त्या भूलथापांना बळी पडून आणि चुकीच्या उमेदवाराला निवडून देतो. निवडणूक आल्यावर मतदार संघात विकास होतांना दिसत नाही.
-प्रियांका गायकवाड, एम. एस. सी, न्यू आर्टस, कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज
तरुणांच्या काही महत्वाच्या समस्या लक्षात घेऊन मी माझं पहिलं अमूल्य मत सक्षम उमेदवाराला देणार आहे. गोंधळ होतोय थोडा, पण सगळ्या विचाराअंती योग्य उमेदवारला निवडून देईल. मतदान करतांना उमेदवार शिक्षित आहे का, त्याला सामान्यांची प्रश्नांची जाण आहे का, ह्या बाबी तपासून मतदान करेल.
-ओंकार सांगळे बी. कॉम. – 1, न्यू आर्टस, कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज
नगरला उद्योग नाही, रोजगार नाही. केवळ विकासाच्या नावाखाली भीक मागून आजवर इथले सत्ताधीश सत्तेत आले. पण, विकास काहीच नाही. आपलं शहर, रस्ते खड्यात आहेत की, खड्यात शहर आहे. समस्या इतक्या आहेत की, बोलायलाच नको. एकच करणार, जो उमेदवार मूलभूत प्रश्न मार्गी लावेल, त्यालाच आपलं मत असेल – वोट फॉर चेंज
-केतन येवले, फिल्म टेकॅनॉलॉजि, न्यू आर्टस, कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज
मला कुठल्या पक्षाशी देणं घेणं नाहक, ना कुठल्या पक्षाच्या उमेदवाराशी. मला वाटतं, माझ्या मतदार संघात विकास न होण्याला बेजबाबदार राज्यकर्ते आहेत. त्यामुळे यावेळेस मतदान करतांना हा विचार करेल की, जो उमेदवार सुशिक्षित आहे. जो विकास करेल, पण जनतेला विचारात घेऊन. जनतेच्या कलाने जाणारा उमेदवार निवडून देईल. असा उमेदवार नसेल तर नोटा दाबेल.
-नमिता मेहतानी, बी. एसस्सी., नगर कॉलेज
एकूणच आपलं राजकारण गुंड प्रवृत्तीचं आहे. फार कमी लोक आहेत, जे चांगलं राजकारण करतात. शहरात गुन्हेगारी इतकी वाढली, की बोलायलाच नको. आज एक स्त्री शहरात नऊ नंतर फिरू शकत नाही. याला जबाबदार कोण ? –
रितिका गाडे, बी. एसस्सी., नगर कॉलेज
आमच्या विभागातील उमेदवारांची नावं व त्यांचं शिक्षण बघून मला योग्य वाटलेल्या उमेदवारालाच मत देणार आहे. शिवाय, जो तरुणांचे प्रश्न समजून घेईल, तरुणांसाठी रोजगार उभा करेल, मी त्यालाच मत देणार आहे. कारण, माझ्या एका मतानेही बदल घडू शकतो, असं वाटतं.
– प्रभात शिंदे, एम. ए. (राज्यशास्त्र), नगर कॉलेज
राजकारण वाईट नसत. निवडून देणारे लोक, त्यांच्या कृतीने कायम सिद्ध करत असतात, की राजकारण वाईट आहे. चांगली लोकं राजकारणात असावी, असं वाटतं. त्या उमेदवाराला निवडुन देतांना आपण मतदारांनी विचार करणं गरजेचं. मी विचार करून मत देणार आहे. कारण, मतदान ही एक शक्ती आहे, ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, असं मला वाटतं.
-संदीप गवळी, बी. कॉम (नगर कॉलेंज)खोट्या विकासाआडून जाती-पातीचं राजकारण होतं. या जातीची इतकी मतं, तमुक जातीची तितकं मतं, अशी उमेदवार मनातल्या मनात आपल्याला पडणाऱ्या मताचा अंदाज बांधतात. अस्मितांचं राजकारण होतं इथे. इतके सगळे आमदार झाले, पण इथे कुणीही रोजगार निर्माण करू शकले नाही. रोजगार सोडा, अहो इथले रस्त्यांची समस्या कुणी दूर करू शकला नाही. सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावरच्या खड्ड्यातून जातो, तेव्हा स्वतःच्या नकळत तो स्थानिक राजकारण्यांना शिव्याच हासडतो. या सगळ्यात बदल व्हावा, म्हणून लोकशाहीच्या कार्यात मतदान करून बदलात सहभागी होणार आहे. हे करतांना काही निकष ठरवले की, माझा आमदार शिक्षित असावा, त्याला मतदार संघातील प्रश्नांची जाण असावी, त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमि नसावी. तो लोकशाहीमार्गाने निवडणूक येवून राजेशाही मार्गाचा अवलंब करणारा नसावा. मी लोकसभेत राष्ट्रीय मुद्दे विचारात घेतले होते, तर विधानसभेत स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देऊन मतदान करणार आहे.
प्रमोद तांबे फिल्म टेकनिक, न्यू आर्टस महाविद्यालय.