-प्रा. अविनाश कोल्हे
प. बंगालमधील विधानसभा निवडणूक व्हायला तब्बल चार महिने आहेत. त्यामुळे वातावरण कसेही फिरू शकते. अनेक शक्ती, अनेक पक्षं एकत्र येऊ शकतात, युती/आघाडी होऊ शकतात.
प. बंगालमधील राजकीय ताणतणाव समजून घेण्यासाठी पश्चिम बंगालचा स्वातंत्र्योत्तर इतिहास नजरेखालून घालावा लागतो. या राज्यात बरेच राजकीय बदल झालेले दिसून येतात. 1952 साली झालेल्या निवडणुकांत देशात अन्यत्र जिंकली तसेच इथंसुद्धा कॉंग्रेस विजयी झाली आणि एकूण 238 पैकी 150 जागा जिंकून सत्तेत आली. या निवडणुकांत कम्युनिस्ट पार्टीला 28 तर तेव्हाच्या भारतीय जनसंघाने 9 जागा जिंकल्या होत्या. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे यात अखिल भारतीय हिंदू महासभा या पक्षाने 4 जागा जिंकल्या होत्या. या चित्रात लक्षणीय बदल झाला तो 1957 च्या विधानसभा निवडणुकांत. यात कॉंग्रेसला 252 पैकी 152 तर कम्युनिस्ट पक्षाला 46 तर भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र हिंदू महासभेने 25 जागा जिंकल्या होत्या. मे 1962 मध्ये झालेल्या तिसऱ्या विधानसभा निवडणुकांतही कॉंग्रेसने लक्षणीय यश मिळवले होते तर भाजस आणि हिंदू महासभेला भोपळा फोडता आला नव्हता. हा काळ कॉंग्रेस वर्चस्वाचा काळ होता.
आपल्या देशात 1967 सालच्या निवडणुकांचे आगळे महत्त्व आहे. या निवडणुकांत कॉंग्रेसचा उत्तर भारतातील सर्व राज्यांत, पूर्व भारतातील पश्चिम बंगालमध्ये तर दक्षिण भारतात तमिळनाडूत पराभव झाला होता. पश्चिम बंगालमध्ये बिगरकॉंग्रेस आघाडी सत्तेत आली आणि अजय मुखर्जी मुख्यमंत्री झाले. 1967 ते 1977 या सालांदरम्यान राज्यात नक्षलवादी चळवळीने आणि राजकीय अस्थैर्याने धुमाकूळ घातला होता. 1972 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत आली आणि सिद्धार्थ शंकर रे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पोलीस दलाचा वापर करून नक्षलवादी चळवळ चिरडली.
मात्र आणीबाणीनंतर जून 1977 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत एकट्या माकपने 294 जागांपैकी 178 जागा जिंकल्या होत्या.
या निवडणुकांत कॉंग्रेसला फक्त वीस जागा जिंकता आल्या होत्या. 1977 सालापासून पुढची 33 वर्षे म्हणजे 2011 सालापर्यंत तिथं माकपप्रणीत डावे सत्तेत होते. या आघाडीचा पराभव करण्याचा चमत्कार तृणमूल कॉंग्रेस या प्रादेशिक पक्षाने (स्थापना ः 1 जानेवारी 1998) करून दाखवला. या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने 294 जागांपैकी 184 तर डाव्या आघाडीला फक्त 40 जागा आणि कॉंग्रेसला 42 जागा जिंकता आल्या. डावी आघाडीच्या पराभवाने पश्चिम बंगालच्या राजकारणातले दुसरे प्रकरण संपले आणि तिसरे म्हणजे तृणमूल कॉंग्रेसचे प्रकरण सुरू झाले.
“तृणमूल कॉंग्रेसने 2011 साली मिळवलेला विजयही लॉटरी होती’ वगैरे आरोप करणाऱ्यांना ममता बॅनर्जींच्या पक्षाने 2016 सालची निवडणूक दिमाखात निवडून परस्पर उत्तर दिले होते. या निवडणुकांत तृणमूल कॉंग्रेसने 211 आमदार निवडून आणले होते तर डाव्या आघाडीला 26 आणि कॉंग्रेसला 44 जागा जिंकता आल्या. भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. ममता बॅनर्जी तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या.
ममता बॅनर्जी (जन्म ः 1955) हा आपल्या राजकारणातला और प्रकार आहे. त्या अतिशय धडाडीच्या नेत्या आहेत, त्यांच्या मागे घराणेशाहीचा वरदहस्त नाही. आज त्यांनी जे राजकीय यश मिळवलं आहे ते सर्वस्वी त्यांचं आहे. त्या महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात सक्रिय आहेत. कलकत्त्याच्या जोगमयादेवी महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभी केली होती. सुरुवातीपासून त्या कॉंग्रेस पक्षात कार्यरत होत्या. त्यांनी 1984 साली झालेली लोकसभेची निवडणूक जिंकली. तेव्हा त्या सर्वात तरुण खासदार होत्या. या निवडणुकीत त्यांनी माकपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांचा पराभव केला होता. नंतर त्या 1996, 1998, 1999, 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होत गेल्या. त्यांचे कॉंग्रेस पक्षाशी मतभेद झाले आणि त्यांनी 1997 साली कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि 1 जानेवारी 1998 रोजी “ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस’ हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. त्या 1999 साली वाजपेयींच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होत्या. त्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कधी असायच्या तर कधी नसायच्या. त्यांची एकमात्र महत्त्वाकांक्षा म्हणजे पश्चिम बंगालातील सत्ता मिळवायची.
त्यांनी 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकींसाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. या युतीने पश्चिम बंगालमधून 26 जागा जिंकल्या. नंतर डॉ. मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून दाखल झाल्या. 2010 साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत तृणमूल कॉंग्रेसने कोलकाता महापालिका दणदणीत बहुमताने जिंकली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की जर व्यवस्थित काम केलं तर माकपला पराभूत करता येईल. 2011 साली झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी जे भल्याभल्यांना जमलं नव्हतं ते करून दाखवलं व ते म्हणजे लागोपाठ सतत 34 वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव! या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात युती होती. या युतीने 227 जागा जिंकल्या होत्या. यात तृणमूल कॉंग्रेसने 184 जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत.त्यांची कारभार करण्याची पद्धत काहीशी एककल्ली जरी असली तरी एखाद्या हाडाच्या लोकनेत्याप्रमाणे त्यांना जनमताचे योग्य भान असते.
आज भाजपा पश्चिम बंगालच्या संदर्भात फार आक्रमक झालेला दिसत आहे. त्यामागे 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील देदिप्यमान कामगिरी आहे. पश्चिम बंगालमधून लोकसभेत 42 खासदार पाठवले जातात. 2019 साली यापैकी तृणमूल कॉंग्रेसने 22 तर भाजपाने तब्बल 18 जागा जिंकल्या! उरलेल्या दोन जागा कॉंग्रेसला मिळाल्या. म्हणजे थेट सामना तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात आहे.