नवी दिल्ली : देशातील महत्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल पुढे येत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे. नव्या ऊर्जने आपल्याला पुढील वाटचाल करायची असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी हा संदेश दिला. उत्तर प्रदेशसहित मणिपूर, उत्तराखंड आणि कदाचित गोव्यातही भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाकडे सत्ता जाण्याची चिन्हं आहेत.