नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या पाच राज्यातील सर्वात महत्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये दिसत आहे.उत्तरप्रदेशमध्ये भाजप जवळपास 240 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर समाजवदी पार्टी यूपीमध्ये 108 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. हा काँग्रेससाठी मोठा झटका मनाला जात आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. तर भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर इथे काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या फेरीअखेर फक्त 940 मतं मिळाली आहेत.
भाजप फमेदवाराने याठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे. बरीच वर्ष आदिती सिंह या राहुल ब्रिगेडचा युवा चेहरा होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीच्या खासदार आहेत. तर अमेठीत पहिल्या फेरीअखेर समाजवादी पर्टीचे उमेदवार 1 हजार 100 मतांनी आघाडीवर आहे. तिथे काँग्रेस उमेदवाराला फक्त 477 मतं मिळाली आहेत.
दरम्यान, देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.