नवी दिल्ली – सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून या पाचही राज्यात भारतीय जनता पक्षाला सकारात्मक जनादेश मिळेल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात कायद्याचे राज्य पुनर्स्थापित केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना, गडकरी म्हणाले की त्यांनी उत्तरप्रदेशला गुंडांच्या तावडीतून सोडवून विकासाच्या मार्गावर आणले आहे.
उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, आदित्यनाथ हे एक अतिशय यशस्वी मुख्यमंत्री आहेत ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर अभूतपूर्व कामगिरी केली.रस्त्याचे आणि विकासाचो जाळे त्यांनी उत्तरप्रदेशात उभारले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. निवडणुक होत असलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता असल्याने, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पक्ष पुन्हा विजयी होईल आणि पंजाबमध्ये आम्ही एक मजबूत शक्ती म्हणून उदयाला येऊ असे ते म्हणाले.
भाजपने उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्षावरील शेतकऱ्यांच्या रोषाचा मुद्दा नाहीसा केला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपच्या सरकारइतके कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य केलेले नाही असेही ते म्हणाले. ऊस, मका, तांदूळ आणि गहू यांचा अतिरिक्त साठा बायो इथेनॉलमध्ये बदलण्याचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळत आहे. त्यामुळेच धान्य पुरवठादार आता उर्जा दाता होऊ लागले आहेत असे ते म्हणाले.
कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता गडकरी म्हणाले की, भाजपला केवळ हिंदुत्वासाठी नव्हे तर आमच्या कामांसाठी सकारात्मक जनादेश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आम्ही जातिवाद आणि संप्रदायवादावर विश्वास ठेवत नाही असे ते म्हणाले.