अमृतसर –पंजाबमधील दहशतवादाशी लढा दिल्याबद्दल शौर्य चक्र पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले शूरवीर बलविंदरसिंग संधू यांची शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या त्या कृत्यामुळे संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली.
तरन तारन जिल्ह्यातील भिखीविंडमधील घरालगत असणाऱ्या कार्यालयात 62 वर्षीय संधू यांच्यावर हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून पलायन केले. जखमी अवस्थेत संधू यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने संधू यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, तरन तारन पोलिसांच्या शिफारसीवरून पंजाब सरकारने वर्षभरापूर्वी त्यांची सुरक्षा मागे घेतली.
पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवादाने डोके वर काढल्याच्या काळात संधू आणि त्यांच्या परिवाराने प्रचंड धैर्य आणि शौर्य दाखवले. त्या कुटूंबाच्या प्रेरणेतून पंजाबमध्ये अनेकांनी दहशतवादाविरोधात लढण्याचे धाडस दाखवले. त्यातून केंद्र सरकारने 1993 मध्ये संधू यांना शौर्य चक्रने सन्मानित केले. संधू आणि त्यांच्या कुटूंबीयांवर अवघ्या 11 महिन्यांत दहशतवाद्यांनी 16 हल्ले केल्याचे त्यावेळी सरकारकडून नमूद करण्यात आले होते. संधू, त्यांचे बंधू रणजितसिंग आणि त्यांच्या पत्नींनी मिळून दहशतवाद्यांचे हल्ले परतावून लावल्याचा गौरवही सरकारकडून करण्यात आला.
संधू आणि त्यांच्या कुटूंबीयांवर सर्वांत भीषण हल्ला 30 सप्टेंबर 1990 या दिवशी झाला. त्यादिवशी तब्बल 200 दहशतवाद्यांनी संधू कुटूंबाच्या घराला वेढले. त्यावेळी संधू बंधू आणि त्यांच्या अर्धांगिणींनी तब्बल पाच तास दहशतवाद्यांचा मुकाबला केला. पोलिसांची मदत मिळू नये म्हणून दहशतवाद्यांनी संधू यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यात भूसुरूंग पेरून ठेवले होते. संधू कुटूंबाने सरकारने पुरवलेल्या पिस्तुल आणि स्टेनगन्सच्या मदतीने दहशतवाद्यांना निकराचा प्रतिकार केला. त्यामुळे दहशतवाद्यांना माघार घ्यावी लागली होती.