गुवहाटीमध्ये लष्कराकडून फ्लॅग मार्च
दिब्रुगड, साद्या आणि तेजपूरमध्ये संघाच्या कार्यालयावर हल्ला
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ईशान्यकडील राज्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या विधेयकाचा विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. त्यातच आसाममध्ये परिस्थिती चांगलीच चिघळली आहे. आसामच्या गुवाहाटी शहरात नागरीकांनी गुरुवारी सकाळी संचारबंदी झुगारुन हिंसक विरोध प्रदर्शन केले.
Asam is burning.
We don’t want CAB#RajyaSabha#IndiaAgainstCAB #CAB_नहीं_चलेगा pic.twitter.com/1AtKriPNJQ— Chayanika Bharali (@ChayanikaBhara2) December 11, 2019
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसाम आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये लोकांच्या मनात संताप धुमसत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन संपूर्ण आसाममध्ये तणावाची स्थिती असून लष्कराने गुवाहाटीमध्ये फ्लॅग मार्च केला. गुवाहाटी शहर आंदोलनाचे मुख्य केंद्र असून आसामच्या चार भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. आसाम रायफलच्या जवानांना बुधवारी त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आले.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारतातील राज्यांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. ऑल आसाम स्टुडंट युनियन, क्रिष्क मुक्ती संग्राम समितीने लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. संचारबंदी असताना रात्री रस्त्यावर लोकांचे विरोध प्रदर्शन सुरु होते. गुरुवारी सकाळी गुवाहाटीमध्ये लष्कराने फ्लॅगमार्च केला.
मोठया प्रमाणात गाडयांची जाळपोळ करण्यात आली असून भाजपा आणि एजीपी नेत्यांच्या घरावरे हल्ले झाले आहेत. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांनी दिली. दिब्रुगड, साद्या आणि तेजपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आले आहेत.