नवी दिल्ली – आसाम आणि मिझोरमच्या सीमावर्ती भागात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे पाच जवान शहिद झाले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या पाच तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. या दोन राज्यांत अचानक असा हिंसाचार का सुरू झाला याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने येथील स्थिती आता नियंत्रणाखाली असल्याचे सूचित केले आहे. मात्र या हिंसाचाराला ही पाच कारणे जबाबदार असल्याचे सांगितले जाते आहे.
आसाम आणि मिझोरम या दोन्ही राज्यांत अचानक सीमा विवाद सुरू झाला आणि दोन्ही कडच्या पोलीस दलांनी परस्परांवर गोळीबार केला. यात आसाम पोलीस दलाचे पाच जण मरण पावले आहेत. तर पन्नास जण जखमी झाले आहेत.
मुळात सीमेची आखणी कथितपणे चुकीच्या पध्दतीने झाली असल्याचा राग दोन्ही राज्यांच्या मनात आहे. त्यात एका विशिष्ट जागेवरून हा संघर्ष उफाळून आल्याची माहिती आहे. ब्रिटिशांच्या काळात सीमेसंदर्भात दोन अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. आसामचा कछार आणि मिझोरमचा कोलासिब जिल्हा या दरम्यानच्या जमीनीसंदर्भात हा वाद आहे. दोन्ही राज्ये परस्परांवर अतिक्रमणाचा दावा करत असून या जागेवर आपलाच हक्क असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मुळात मिझोरम हा पहिले आसामचाच भाग होता व त्याला तेव्हा लुशाई हिल्स असे म्हटले जायचे. 1972 मध्ये त्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले व त्यानंतर 1987 मध्ये स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले.
करिमगंज – मामित आणि हैलाकांडी-कोलासिब या जिल्ह्यांच्या सीमांवर तेव्हापासून वादाची स्थिती आहे.
मिझोरमचा शेजारी त्रिपुरा या राज्यासोबतही सीमेवरून वाद आहे. या जुन्या वादांमुळे अधुनमधुन संघर्ष उफाळून येत असून आपल्याच देशाची दोन राज्ये आज परस्परांच्या जीवावर उठली आहेत.