गुवाहाटी – महिलांनी योग्य वेळी माता बनले पाहिजे, अन्यथा त्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आमचे सरकार मुलींचे लवकर लग्न होण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच राज्यात बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकार पोक्सो कायदा आणण्याच्या तयारीत आहे, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी केले आहे.
एका सरकारी कार्यक्रमात बोलताना सरमा म्हणाले की, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे, जरी तो अल्पवयीन मुलीचा पती असला तरीही. अशा परिस्थितीत येत्या पाच ते सहा महिन्यांत हजारो लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. महिलेचे लग्नाचे कायदेशीर वय 18 वर्षे असून जे अल्पवयीन मुलींशी विवाह करतात, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. या प्रकरणात अनेकांना जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते. राज्यात सरासरी 31 टक्के विवाह निर्बंधित वयात होत आहेत.
मातृत्वाविषयी बोलताना सरमा म्हणाले की, महिलांनी माता होण्यासाठी जास्त वेळ थांबू नये; कारण त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. आई होण्यासाठी योग्य वय 22 ते 30 वर्षे आहे. देवाने आपले शरीर अशा प्रकारे बनवले आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आहे. ज्या महिलांचे लग्न झाले नाही त्यांनी घाई करावी, असेही सरमा म्हणाले.
आसाम मंत्रिमंडळाने सोमवारी पोक्सो कायदा लागू करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली, ज्या अंतर्गत 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आसाममध्ये माता आणि बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार कायदा आणत आहे.