दिसपूर – आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यात रविवारी एक रस्ता अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास बिहू टीमचे काही सदस्य कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना गोहपूरजवळ हा अपघात झाला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात तीन मुलींसह पाच जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. संजय बासुमातारी (17), कोलीमन बासुमातारी (21), बोरनाली बोरो (15), बुद्धिमोती बोरो (14) आणि राधिका डेमरी (15) अशी मृतांची नावे आहेत.
अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसत असले तरी सखोल तपासानंतरच याची पुष्टी होऊ शकते. वाहनात सुमारे 20 लोक होते. अपघातानंतर चालक तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आसाममधील विश्वनाथ जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःखी असल्याचे पंतप्रधानांनी ट्विट केले. ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे मोदींनीट्विट केले. यानंतर मुख्यमंत्री सरमा यांनी ट्विट केले की, काही लोक बिहू समारंभातून घरी परतत होते त्यावेळी हा अपघात घडला. प्रशासनाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास आणि जखमींना आवश्यक ती सर्व मदत देण्यास सांगण्यात आले आहे. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असे सरमा म्हणाले.