नवी दिल्ली, दि. 26 – माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आसामातील पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदार संघातील मतदारांना उद्देशून एक व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यात त्यांनी लोकांना हुशारीने व जागरूकपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की लोकशाही आणि घटनेची बूज राखणाऱ्यांनाच लोकांनी मतदान केले पाहिजे. 88 वर्षीय मनमोहनसिंग हे 1991 ते 2019 या काळात आसामातून राज्यसभेवर निवडून गेले होते. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, आसामातील लोकांच्या पाठिंब्यामुळे मी पाच वर्ष अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून दहा वर्ष देशाची सेवा करू शकलो आहे. त्यामुळे आसामला मी नेहमीच आपले दुसरे घर मानत आलो आहे.
तुमच्यातला एक म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. आता तुम्हाला पुन्हा मतदान करण्याची संधी आली आहे. यावेळी मतदान करताना विचारपुर्वक मतदान करा. लोकशाही आणि घटनेची बुज राखणाऱ्यांच्याच पाठीशी उभे राहा असे आवाहन त्यांनी केले आहे. मनमोहनसिंग यांनी तरूण गोगोई सरकारने सन 2001 ते 2016 या अवधीत आसामसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांचाच कारकिर्दीत आसामात शांतता आणि विकासाचे नवीन पर्व सुरू झाले असे त्यांनी नमूद केले. पण आता या पर्वाला अलिकडच्या काळात मोठे तडे गेले आहेत.
धर्म, संस्कृती आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. लोकांना त्यांचे सामान्य अधिकारही मिळू दिले जात नाहीयेत. राज्यात सध्या सर्वत्र तणाव आणि भितीचे वातावरण आहे. चुकीच्या विचारातून करण्यात आलेली नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीमुळे संपुर्ण देशाच्या अर्थकारणाची वाट लागली आहे. लाखो लोकांची रोजीरोटी हिरावली गेली आहे.
रोजगारासाठी युवक सर्वत्र हिंडत बसले आहेत. इंधन आणि गॅसच्या दरवाढीने सामान्य लोकांचे जीणे हराम झाले आहे. आता मात्र तुम्ही सर्व नागरीकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार निवडा, प्रत्येक समाजाच्या हिताची काळजी घेणारे सरकार निवडा आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार करणारेच सरकार निवडा असे आवाहनही त्यांनी केले आहे. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून मतदान करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.