सरूपथर, दि. 22 – भारतीय जनता पक्षाने आसामात माफियांसारखा कारभार चालवला असून त्यांच्या येथे गैरकारभार करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत, असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना केला. त्या म्हणाल्या की, राज्यातील भाजप हा दोन गटांत विभागला गेला असून दोन्ही गटांनी लोकांचा विश्वासघात केला आहे.
आसामातील भाजपच्या नेतृत्वाची तुलना त्यांनी धृतराष्ट्र आणि शकुनींशी केली. त्या म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांनी अनेक बाबतीत आसामातील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपच्या एका महान नेत्याने येथील सहा आदिवासी जातींना अनुसूचित जमातींच्या यादीत समाविष्ट करून त्याचे लाभ मिळवून देण्याची घोषणा केली होती.
Watch: Smt. @priyankagandhi addresses a public rally in Sarupathar, #AssamWelcomesPriyankaGandhi https://t.co/2gmlNUO26x
— Congress (@INCIndia) March 22, 2021
पण नंतर मात्र ते हे आश्वासन सोईस्कररित्या विसरले आहेत. भाजपला या राज्यात अजून आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवता आलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या, भाजपला त्यांच्या पक्षातच शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करता आलेले नाही ते या राज्यात शांतता आणि स्थैर्य कसे प्रस्थापित करू शकतात, असा सवालही त्यांनी केला.