प्रभात वृत्तसेवा पिंपरी, दि. 1 – महापालिका निवडणूक लवकरच होण्याचे संकेत आहेत. तसेच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे इच्छुकांना आता नागरिकांच्या समस्यांची जास्तच काळजी वाटू लागली आहे. गेले 20 आठवडे शांत असलेले माजी नगरसेवक आणि इच्छुक जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट जनसंवाद सभेत पोहचू लागले आहेत. सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेत आलेल्या 96 पैकी बहुतांशी तक्रारी या माजी नगरसेवक व इच्छुकांकडून करण्यात आला.
नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 9, 15, 8, 10, 15, 5, 23 आणि 11 नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारवजा सूचना मांडल्या. यात प्रामुख्याने अतिक्रमणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ता दुरुस्ती असे विषय मांडण्यात आले आहेत.