विधानपरिषद निवडणुक ः चार जागांवर उमेदवार देण्याची शक्यता
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांना अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली. येत्या 21 मे रोजी राज्यात 9 रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्यपदी निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळण्याची आशा आहे. यासाठी भाजपच्या गोटात येत्या काळात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेने कमी जागांवर संधी मिळणार आहे. त्यामुळे या मोजक्या रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी भाजपमधल्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
विधानसभेचे पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि कॉंग्रेसला एक जागा सुटू शकते. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या “स्वकीय आणि परकीय’ अशा दोन्ही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
यात भाजपचा आक्रमक ओबीसी चेहरा असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. विधानसभेत मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे मराठवाड्यात पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न भाजपकडून होवू शकतो. तसेच मागील पाच वर्षे ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री म्हणून कामाचा अनुभव असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी त्यांना संधी दिली जावू शकते.
तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांन उमेदवारी नाकारल्यामुळे तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत पाठ फिरवली होती. नितीन गडकरी यांचे ते निकटवर्तीय असून माजी मंत्री म्हणून प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. याशिवाय आर्थिक पाठबळ असलेला विदर्भाचा महत्त्वाचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
इंदापूरमधून पराभूत झाल्यानंतर भाजपात सक्रिय राहण्यासाठी हर्षवर्धन पाटील याना विधानपरिषदेत वर्णी देण्यात येवू शकते. उत्तम संसदपटू आणि संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास असल्याने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे सक्षम नेते मानले जातात.
लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून थेट शरद पवारांना शह दिला. मात्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. याशिवाय कोल्हापूरातील मुन्ना महाडिक यांचेही नाव चर्चेत आहे.
दरम्यान, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच जाणार केली.