नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांच्या जागी दोन वर्षासाठी अध्यक्ष होण्याची तयारी माजी ऑलिम्पीकपटू व कॉंग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी दर्शवली आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर मी त्यांना एक पत्र पाठवून ही तयारी दर्शवली आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपदी कायम राहण्याची तयारी दर्शवली तर ठीकच होईल पण जर त्यांना या पदावर राहण्याची इच्छा नसेल तर आपण त्या पदावर दोन वर्षांसाठी राहु इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी ही इच्छा प्रदर्शित करण्याचे कारण सांगताना म्हटले आहे की, मी कोणत्याहीं व्यक्तीगत महत्वाकांक्षेने नव्हे तर पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याच्या इच्छेने ही तयारी दर्शवली आहे. पक्षात आता आमुलाग्र बदल होण्याची गरज असून पक्षाने पुन्हा आपली राष्ट्रीय प्रतिमा जपण्याची गरज आहे. पक्षापुढे सध्या अत्यंत अडचणीची स्थिती असून या काळातील जबाबदारी घेण्यासाठी कुणी तरी पुढे येण्याची गरज आहे. ती गरज मी भागवू शकतो असा दावा त्यांनी केला आहे. तथापि पक्षाच्या पराभवाला राहुल गांधी हे जबाबदार नाहींत हे स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की पक्षाच्या विजयासाठी राहुल गांधी यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती हे पुर्ण सत्य आहे. पण देशातील लक्षावधी जनतेने पुन्हा मोदींनाच स्वीकारले आहे. त्यांच्यापुढे कॉंग्रेसची विचारधारा अधिक नेमकेपणाने पोहोचवण्यात आम्हीं कमी पडलो असेही त्यांनी म्हटले आहे.