नवी दिल्ली – संसद अधिवेशनात विरोधकांनी सरकारला टोकदार आणि अत्यंत अवघड प्रश्न विचारावेत पण त्याला उत्तर देण्याची त्यांनी सरकारला संधी द्यावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज पासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.
त्यावेळी संसदेकडे जात असताना त्यांनी आज पत्रकारांपुढे निवेदन केले. त्यात त्यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले की देशातील कोविड स्थिती विषयी सविस्तर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी सायंकाळी थोडा वेळ काढावा मी त्यांनी या कोविड लाटांच्या संबंधात सविस्तर माहिती देईन असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आम्हाला कोविड संबंधात संसदेत आणि संसदेबाहेरही सविस्तर चर्चा करायची इच्छा आहे असे ते म्हणाले. देशातील लोकांना उत्तरे देण्यासाठी सरकार तयार आहे असेही त्यांनी सांगितले. संसदेत विस्तृत चर्चा झाल्यानंतरच लोकांपर्यंत सत्यस्थिती पोहचू शकते आणि लोकांचा त्यातून विश्वास वाढतो. हा विश्वास वाढला की विकासाचाही वेग वाढतो असे त्यांनी म्हटले आहे.