सुपा – एमआयडीसी झाली, तर या भागातील गोरगरिबांची मुले नोकरी, धंद्याला लागतील. मग आपल्या मागे फिरायला कोणी रहाणार नाहीत. म्हणून गरिबाला गरीब ठेवण्याच्या घातक हेतूने आमदारांनी नगर तालुक्यातील घोसपुरी एमआयडीसीला खोडा घातला आहे. त्यामुळे या प्रश्नी त्यांना जाब विचारला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केली.
खडकी (ता. नगर) आयोजित प्रचार सभेत लंके बोलत होते. खडकीचे सरपंच अशोक कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठुळे, राजेंद्र कोठुळे, मच्छिंद्र कोठुळे, संजय कोठुळे, हेमंत कोठुळे, नीलेश कोठुळे, सुधाकर कोठुळे, रावसाहेब कोठुळे, अदिनाथ गायकवाड, राहुल निकम, संतोष बहिरट, भाऊसाहेब बहिरट आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, शेतीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसने ग्रामीण भागात एमआयडीसी निर्माण करण्यावर कायम भर दिला. त्यातून तत्कालीन राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी नगर तालुक्यातील घोसपुरी भागात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, अशा घोसपुरी, बाबुर्डी बेंद, हिवरेझरे येथील शेतकरी आणि एमआयडीसी अधिकारी यांच्या बैठकाही झाल्या. शेतकरी जमिनी द्यायला तयारही होते.
27 लाख रुपये एकर दर देण्यास शासनही तयार होते. पण माझ्या मतदारसंघात असून, मला विचारले नाही. येथील तरुणांच्या हाताला काम मिळाले तर पुढे ते आपल्या मागे फिरणार नाहीत. हा भाग गरीब राहिला तरच आपले फावेल, या वाईट हेतून येथील एमआयडीसीला आमदार औटींनी खोडा घातला. एवढेच नव्हे तर निंबळक एमआयडीसी सुधारावी म्हणून आणि साकळाई पाणी योजनेबाबत 10 वर्षांत कधी विधानसभेत आवाज उठवला नाही. त्याचा जाब आता मतदारांनी त्यांना विचारला पाहिजे, असेही लंके म्हणाले.