मुंबई : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारितील भारत पेट्रोलियमने “परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय’ म्हणजेच “सतत’ या योजनेच्या प्रसारासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
“सतत’ म्हणजेच “सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टूवर्डस अफोर्डेबल ट्रान्सोर्टेशन’ ही योजना 15 ऑक्टोबर 2018 रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरु केली होती. या योजनेचा प्रसार करण्यासाठी संबंधित उद्योग आणि इतर घटकांनी एकत्र येऊन आज नवी मुंबईत रोड शो आयोजित केला होता.
यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे संचालक विजय शर्मा उपस्थित होते. इंधन वाचवणे ही काळाची गरज आहे. आज आपण हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचा सामना करत असतांना अपारंपरिक अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळायला हवे, असे शर्मा म्हणाले.
या दृष्टीने सीएनजी आणि एलपीजी हे दोन नैसर्गिक वायू इंधनाचे स्रोत आहेत, “सतत’ या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, असे शर्मा यांनी सांगितले.
बायो गॅसच्या निर्मितीची प्रक्रियाही त्यांनी समजावून सांगितली.
स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे महत्व जाणून घेत, आशियाई विकास बॅंकेने “सतत’ योजनेला 2 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात 67 पर्यायी ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.