दुबई – भारताचे अव्वल मुष्टियुद्धपटू अमित पांघल, विकास कृष्णन, अव्वल महिला खेळाडू मेरी कोम आणि युवा मुष्टियोद्धा वरिंदर सिंग यांनी आपापल्या लढती जिंकत आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत कमालीची सरस कामगिरी करत भारताने आतापर्यंत 15 पदके निश्चित केली आहेत.
पांघल याने 52 किलो उपांत्यपूर्व लढतीत मोंगोलियाच्या खारखू इंखमंडाख याचा 3-2 असा पराभव करत आगेकूच केली. त्याला उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या साकेन बोबिस्सिनोव्ह याच्याशी लढत द्यावी लागेल. वरिंदरने 60 किलो गटात फिलिपीन्सच्या जेरे सॅम्युएल्स डेला क्रूझ याच्यावर 5-0 अशी सहज मात केली.
विकास कृष्णन यानेही इराणच्या मोसलेम मालामीर याचा 4-1 असा पराभव करत उपांत्यफेरी निश्चित केली. विकासला उपांत्य फेरीत उझबेकिस्तानचा अव्वल मानांकित बोबो उस्मोन बातुरोव्ह याच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
भारताने या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली असून, 2019 साली 13 पदके मिळवली होती. अन्य लढतीत, आशिष कुमार (75 किलो) तसेच एम. सी. मेरी कोम (51 किलो), सिमरनजित कौर (60 किलो) यांनीही विजयासह आगेकूच केली.